मुंबई – दसऱ्याच्या मुहूर्तावर मध्य गोदावरी उपखोऱ्यातील 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता देऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यातील जनतेला दसऱ्याची भेट दिली आहे. गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतूदीनुसार दिनांक 6 ऑक्टोबर 1975 पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित असून त्यानंतर 60 टीएमसी पाणी वापरास मान्यता दिलेली होती.
गोदावरी खोऱ्यात 1975 च्या आधी पाणी वापर केलेला होता. त्यामध्ये पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी महाविकास आघाडी शासनाच्या जलसंपदा विभागाने आता दूर केल्या आहेत. या त्रुटी दूर केल्यामुळे आता मध्य गोदावरी उपखोऱ्यात एकुण (60 + 61.29 = 121.29) टीएमसी पाणी वापराचे नियोजन करणे शक्य आहे. हे लक्षात घेत 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास गुरुवारी मंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे.
आता 19.29 टीएमसी पाणी वापर मंजूर झाला आहे. याचा अर्थ पूर्वीचे 60 टीएमसी आणि आताचे 61.29 टीएमसी म्हणजे 121.29 टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे.
जे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते त्या प्रकल्पांना आता गती मिळणार आहे. बीड, हिंगोली, नांदेड या भागातील पाण्याचे प्रश्न तसेच प्रकल्पांतील अडथळे दूर होतील आणि या भागातील सिंचन क्षमतेत वाढ होण्यास मदत मिळेल. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान मागच्या कालखंडात मंत्री जयंत पाटील यांनी या भागात दौरा करत या भागातील प्रकल्पांचे प्रश्न जाणून घेतले होते. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यात जास्तीत जास्त पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची टप्प्याटप्प्याने पूर्तता होत असल्याचे हे चित्र आहे.