पाटण (प्रतिनिधी) – राज्यातील जनतेमध्ये सत्तेत असणाऱ्या सरकारबद्दल प्रचंड नाराजी असून जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकारला आव्हान देत असताना हे सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
सुप्रीम कोर्टात सरकारच्या भवितव्याचा निर्णय होणे बाकी असून त्याच्यावर 4-6 महिन्यात कार्यवाही होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून गेले, त्याप्रमाणे शिंदे-फडणवीस सरकार जाऊन पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले; हे कळणार सुद्धा नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील शिंदे सरकारला दिला.
पाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत, सोसायटी, तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, भाजपचे राज्यपाल काहीही विधान करत आहेत. शाहु, फुलेंच्या विचारधारेला चंद्रकांत पाटील यांनी उपशब्द वापरले. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अपशब्द वापरले, छ. शिवाजी महाराज आग्रा भेटीची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटीशी करत आहेत. इतिहास बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न आताचे नेते करत आहेत. भाजपकडून छ. शिवाजी महाराजांची निंदानालस्ती करण्याचे काम जाणिवपूर्वक केले जात आहे.
चीनकडे डोळे वटारून पाहायची मोदींची ताकद नाही – पृथ्वीराज चव्हाण
ते म्हणाले, सीमा वादावर कर्नाटकचे मंत्री दररोज शिव्या देत आहेत. परंतु, महाराष्ट्रातील मंत्री काही बोलत नाही. मी म्हणतोय कोयना, वारणा धरणाची उंची वाढवा! यांची कोंडी करा. महाराष्ट्रातील लोकांना विश्वास वाटत नाही, म्हणून ते इतरत्र स्थलांतरित होण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे सीमा प्रश्नाबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी, असेही माजी मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.