सध्या चालू महिला विश्वचषकतील भारताच्या लेकीची कामगिरी.. नवप्रदर्शित ‘थप्पड’ चित्रपटात हाताळलेला विषय आणि त्यापूर्वी झालेल्या हैद्राबाद , हिंगणघाट अशा घटना… ही ‘वैश्विक ते स्थानिक’ अशी सारीच उदाहरणं खरंतर भारतीय समाज व्यवस्थेचं चित्रण करून जातात.. वैश्विक व्यासपीठावर संधी मिळवून चमकणाऱ्या आपल्या क्रिकेटपटू आणि हैद्राबाद, हिंगणघाट येथे फुलू पहाणाऱ्या फुलांचे संपलेले ‘अस्तित्व’ इतक्या विरोधाभासी ,दुबळ्या आणि खुज्या समाजव्यवस्थेमध्ये आपण आहोत हे आता सर्वमान्य झालंच आहे.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना, स्त्री, पुरुषप्रधान मानसिकता सुरक्षा इ. विषयांचा चर्चा करून पीट्टा पडला असला तरी सुप्रीम कोर्टाच्या अलीकडील काही निर्णयांमुळे समाज ‘स्त्रीपुरुष समानतेकडे’ (?) वाटचाल करत आहे वगैरे बोलले गेले. त्याला पुरावे म्हणून काही कायद्यांमध्ये बदलही झाले. पण कायद्याने कितीही तरतूदी केल्या तरी समाजातील घटकांमध्ये त्या तरतूदी पचवण्याची आणि अंगीभूत करण्याची वैचारिक सक्षमता आहे का? आणि नसेल तर ती बांधण्याचे सामर्थ्य आपल्या शिक्षणव्यवस्थेत , कुटुंबव्यवस्थेत आहे का ? खरंच आपण सामाजिक विचारधारेच्या संक्रमण अवस्थेत आहोत ? की हा केवळ एक भास आहे असे वाटल्यावाचून राहत नाही.
पुरुषप्रधानतेच्या पुरस्काराचे परमोच्च शिखर म्हणजे भारतीय विवाहसंस्था !! जी केवळ आणि केवळ स्त्रियांच्या त्यागावरच रचली आहे. काही गंजलेल्या विचारांच्या पायावर उभ्या असलेल्या विवाहसंस्थेमध्ये मूलतः काही दोष आहेत. परंतु ‘भारतीय कुटुंबव्यवस्था आणि संस्कृती’ आशा नावाखाली स्त्रियांचे आत्तापर्यंतचे ‘भावनिक शोषण’ यापेक्षा जास्त कुठेच झालं नसेल.
“आई , बहीण , पत्नी, मैत्रीण, आजी इ. अनेक भूमिकांमध्ये स्त्रीने उत्तम असावं, रंगाने उजवी, नाकीडोळी पण व्यवस्थितच हवी. वागण्याबोलण्यातल्या मर्यादांची तिला(च) जाण असावी, तिने घरातल्या (ही) सर्व कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, तिने शिकावं मोठं व्हावं, नोकरी करावी पण कितीही झालं तरी स्वयंपाक तिला यायलाच हवा. नाहीतर तर तिने तो शिकावा(च). सगळ्यांची मनं जपावी, साथीदाराच्या स्वप्नांना तिने आधार द्यावा. तिने कार्यालयातही मिळूनमिसळून रहावं. फार बोलू नये, तिला फार ‘मित्र’ नसावेत. पुरुषांशी फार व्यवहार नसावा! तिने घर सांभाळून (च) सर्व करावं अगदी तिचा जॉब सुद्धा !!” किती भयावह आहे हे! यातली एकतरी गोष्ट पुरुषांनी करावी असे आपली समाजव्यवस्था म्हणते का? “तिला जॉब करून घर सांभाळता यायला हवं. हल्ली कित्येक मुली करतात.” (नाइलाज म्हणून!) अरे पण जॉब सांभाळून घर सांभाळ असे आपण पुरुषांना शिकवतो का? किंवा त्यांना शिकवण्यासंबंधी वाच्यता तरी करतो का? पूर्वी अर्थकारणामुळे आणि शारीरिक रचनेमुळे स्त्रियांना काही ठराविकच साच्यात बांधलं गेलं होतं. आज तंतोतंत तशी परिस्थिती नसली तरी ‘साचा’ बदललाय पण स्त्रीला ‘बांधलं’ जात आहेच. कांदापोह्याच्या कार्यक्रमात ‘उजवा पाय टाकून बस हा पाटावर’ पासून ते ‘तुझ्या लग्नाबद्दल काय अपेक्षा आहेत?’ इथपर्यंत प्रवास केला आपण; कदाचित त्या पुढेही! पण ‘तू लग्नासाठी तयार आहेस का?, तुझ्या आयुष्याकडून काय अपेक्षा आहेत.. मुळात तुला काय हवंय ग?’ इथपर्यंत यायला आपल्या समाजाचे वैचारिक आरोग्य संपादित झालेले आहे का , याचा विचार महिलादिनाच्या निमित्ताने तरी करावा लागेल.
समाजातील एक दुर्बल घटक म्हणून कायमच कोणत्याही स्थितीला सर्वांत आधी स्त्रिया बळी पडल्या. ‘चारित्र्यवान’ ‘कुलवान’ असल्या ‘थोतांडी संज्ञेखाली’ तिची मानसिक पिळवणूक आजही चालूच आहे. त्यातही एखादी उठून बोलणारी, विद्रोह करणारी असेल तर तिला कोणत्याही थराला जाऊन विरोध केला जातो. एवढंच काय मर्यादेखाली जाऊन विनोद, बदनामी केली जाते. कार्यालयांत वगैरे महिलांच्या वागण्या बोलण्याची , त्यांनी दिलेल्या सूचनांची खिल्ली उडवली जाते. स्त्रियांच्या वाहन चालवण्यावर, त्यांच्या गप्पा मारण्यावर , त्यांच्या बुद्धीवर देखील हास्यात्मक टिप्पणी केली जाते. एखादी स्त्री तिच्या ‘दिसण्यापेक्षा’ तिच्या ज्ञानामुळे, कलेमुळे आणि गुणांमुळे क्वचितच ओळखली जाते आणि स्वीकारली देखील जाते. ही अशी ‘आजारी मानसिकता’ पुरुषांचीच असते असं नाही यामध्ये स्त्रियाही आहेत. स्त्रियांनीही एकमेकींच्या अशा गुणांचा सत्कार केलेला आपण कमी वेळा पाहतो. त्याला वरवर पाहता त्या जबाबदार असल्या तरी त्याची मुळे ही पुरुषप्रधानतेमुळे त्यांना येणाऱ्या ‘असंरक्षितपणामध्ये’ आहे हे लक्षात येते.
एखाद्या स्त्रीसाठी तिचा वाढदिवस , लग्न इ. दिवस खूप ‘मोठे’ ‘महत्वाचे’ आहेत अशी एक साधारण धारणा आहे. त्या दिवशी सर्व त्या स्त्रीशी मनाप्रमाणे होणार, किंवा तिच्या निवडींना तेव्हा प्राधान्य मिळणार. पण एवढा एक दिवस सोडला तर आपण स्त्रीचं ‘अस्तित्व’ कधी साजरं केल्याचं अजूनतरी दिसत नाही. लहानपणापासून ‘लग्न’ हा मोठा दिवस असतो हे स्त्रियांच्या मनावर बिंबवून तिच्या आपण उरलेल्या आयुष्यातलं तिचं जगणं हे किती दुय्यम करून टाकतो! तिला साजरं करण्यासाठी केवळ एकंच दिवस असावा? महिला दिनाच्या निमित्ताने आजकाल अजून एका दिवशी तरी तिला सन्मान मिळतो. हे चांगलं असलं तरी ‘तथाकथित महिला दिन’ सामाजिक स्तरातील सर्व स्त्रियांपर्यंत पोहचला का? अशिक्षित अक्षर ओळख नसेलल्या , माथाडी कामगार महिला, साफसफाई कर्मचारी , आदिवासी वृद्ध महिला, घरकाम करणाऱ्या महिला , वेश्या व्यवसायामध्ये अडकलेल्या महिला यांना महिला दिन वगैरे याची जाणीव असेल का? त्या एकादिवशी तरी त्यांना कोणी फुल, चॉकलेट किंवा किमान शुभेच्छा तरी देत असेल का? आणि नसेल तर मग हा महिला दिन केवळ ‘श्वेतव्याप्ती महिला दिन’ ठरतो असे वाटल्याशिवाय राहत नाही.
म्हणूनच आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री हे एक ‘दिवस’ म्हणून साजरं करण्यापेक्षा ‘तिला’ साजरं करायला हवं. तिच्या संवेदना, जाणीवा , गुण , कला , स्त्रीपण, यश, स्वप्ने,आकांक्षा , भावना हे सर्व साजरं व्हायला हवं आणि ते कोणाकडून होईल यापेक्षा स्त्रियांनीच स्वतःहून स्वतःला बंधमुक्त करायला हवं. तिच्या ‘निवडीच्या स्वातंत्र्याचा’ आदर आणि स्वीकार व्हायला हवा. ‘गुरू’ चित्रपटात ऐश्वर्या पत्रामध्ये एक साधा प्रश्न विचारते “अगर देश आझाद है तो आपकी बेटी क्यूँ नहीं?” तत्कालीन परिस्थितीशी अनुरूप असला तरी आजही हा प्रश्न गैरलागू नाही! जर देश स्वतंत्र आहे तर स्त्रियाही आहेत! आणि त्यांचं स्वातंत्र्यदेखील संविधानातून तर सामाजात रुजवायला हवं. आणि त्यासाठी आता भरीव प्रयत्न आणि कृती व्हायला हवी.
– वरदा रांजणे
खूप छान. इतक्या पैलूंवर सहसा विचार होतच नाही हीच शोकांतिका आहे. मनाला भिडणारं लिखाण. हा लेख वाचून निदान आपल्या आसपासच्या महिलांना तरी सन्मान आणि त्यांचं अस्तित्व आणि अस्मिता जागृत नक्कीच होईल.