स्वच्छता, साफसफाईची लगबग दिसेना; नियोजनाचा अभाव : शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष
नगर – “स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रात “हीरकमहोत्सवी अभियान’ राबविण्याचे शासनाचे निर्देश असले तरी महापालिकेतील स्वच्छता व आरोग्य विभागाच्या स्तरावर हे अभियान कागदावर असल्याचे दिसून येत आहे. साफसफाईच्या कामांसाठी महापालिकेकडे पुरेसे संख्याबळ असले तरी त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले आरोग्य निरीक्षक ढिम्म असल्याचे चित्र आहे. या अभियानासंदर्भात शासनाचे स्पष्ट निर्देश असले तरी महापालिकेचा ढिसाळ कारभार पाहता स्वच्छ महाराष्ट्र अभियान दावणीला बांधल्याचे समोर आले आहे.
1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरकमहोत्सव साजरा केला जाणार असून, यानिमित्ताने स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी 1 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत महापालिका क्षेत्रात हीरकमहोत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान’ राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शासनाने जारी केलेल्या पत्रकानुसार महापालिकेने स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
यामध्ये नाले- गटारांची साफसफाई ठेवण्यासोबतच कचरा टाक ण्याच्या ठिकाणी सौंदर्यीकरण करणे, महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासह शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाय करण्याची सूचना आहे. शासन निर्देशानुसार काम करण्यासाठी महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्ध असल्याने हे आव्हान प्रशासन कशा प्रकारे स्वीकारते, याकडे लक्ष लागले आहे.
शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा आणणारे होर्डिंग, बॅनर तातडीने हटविण्याचे निर्देश आहेत. शहरातील मोजक्या जागांची निवड करून त्याच ठिकाणी जाहिरातींना मुभा देण्याचे निर्देश आहेत. उद्यानांचे सौंदर्यीकरण करून लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांसाठी मनोरंजनाची साधने उपलब्ध करणे क्रमप्राप्त आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी महापालिकेने उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या लघुविक्रेत्यांसह फेरीवाल्यांसाठी धोरण निश्चित करणे गरजेचे आहे.
महापालिकेने हॉकर्स झोन’ तसेच नो हॉकर्स झोन’ निश्चित करून त्याचे पालन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.नियोजनाचा अभाव हिरकमहोत्सवी अभियान राबविताना शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांपैकी महापालिकेचा स्वच्छता व आरोग्य विभाग कितपत पालन करतो, यावरच शहराची स्वच्छता व साफसफाई अवलंबून आहे. तूर्तास महापालिकेकडे नियोजनाचा अभाव असून, त्यावर जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी कसा तोडगा काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.