- बाजारपेठेत कडकडीत बंद
- “कर्फ्यू’मध्ये कुसगाव, कुणेगाव, वरसोली,
- वाकसई ग्रामपंचायत यांचाही समावेश
लोणावळा – करोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरात सोमवारी (दि. 13) आणि मंगळवारी (दि. 14) जनता कर्फ्यू पाळण्यात आला आहे. याच धर्तीवर परिसरातील कुसगाव ओळकाईवाडी ग्रुप ग्रामपंचायत, कुणेनामा ग्रामपंचायत, वरसोली ग्रामपंचायत, वाकसई ग्रुप ग्रामपंचायत यांनी देखील जनता कर्फ्यू पाळण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला. लोणावळा बाजारपेठ आज कडकडीत बंद होती. मेडिकल व्यावसायकांनी देखील या “कर्फ्यू’ला पाठिंबा दिला आहे.
राज्यात विशेषतः मुंबई व पुण्यात करोनाने थैमान घातले आहे. लोणावळा व मावळात करोनाला रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र बाजारभागात सकाळी व सायंकाळी नागरिकांची होणारी गर्दी चिंता वाढविणारी असल्याने शहरातील व्यावसायिकांनी सोमवार व मंगळवार बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोणावळा नगरपरिषद व पोलीस प्रशासनान देखील बाजारपेठेत बिनाकामाचे कोणी येणार नाहीत. याकरिता कृष्णाई हॉटेल चौक, भांगरवाडी इंद्रायणी पूल व कैलासनगर येथे नाकाबंदी केली आहे. सर्व वाहनांची कसोशीने चौकशी करीत संचारबंदीचे गुन्हे देखील दाखल करायला सुरुवात केली आहे.
कुसगाव ग्रामपंचायत हद्दीत शनिवार ते मंगळवार असा चार दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. तसेच अडीचशे गोरगरिबांना धान्य वाटप करण्यात आले असल्याचे सरपंच छाया डफळ व सदस्य दादा डफळ यांनी सांगितले.
ग्रामपंचायत वाहन ग्रामपंचायत हद्दीत फिरून नागरिकांना करोनाबाबत जनजागृती करत आहेत. कुणेनामा ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच संजय ढाकोळ यांनी दानशूर व्यक्तीच्या मदतीने साडेपाचशे नागरिकांना अन्नधान्य व सॅनिटायझर बॉटलचे वाटप केले.
लोणावळा शहराप्रमाणे सोमवार व मंगळवार येथे देखील जनता कर्फ्यू पाळला आहे. वरसोली व वाकसई ग्रामपंचायतीच्या वतीने गावांमध्ये जंतूनाशक फवारणी व दानशूर व्यक्तीच्या मदतीने सर्वसामान्यांना धान्य वाटप केले आहे. सोमवार व मंगळवार या भागात देखील लॉकडाऊन पाळण्यात आला आहे.
लॉकडाऊन हा आपल्या करिताच असल्याने त्याचे सर्वांनी पालन करा, असे आवाहन वरसोली गावच्या सरपंच सारिका खांडेभरड, माजी उपसरपंच संजय खांडेभरड व वाकसई गावचे सरपंच दीपक काशीकर, उपसरपंच गणेश देशमुख, माजी उपसरपंच मनोज जगताप यांनी नागरिकांना केले आहे.
कुरवंडे ग्रामपंचायतीने 9 आणि 10 एप्रिल रोजी जनता कर्फ्यू पाळत गावात जंतूनाशकाची फवारणी केली. कार्ला ग्रामपंचायतीमध्ये देखील तीन दिवसांपासून लॉकडाऊन पाळण्यात आला. शहरातील व गावांमधील सर्व भाजीपाला व किराणा दुकाने दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडता स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.