जामखेड – कर्जत शहराला जोडणारा जामखेड -कर्जत रस्ता सध्या अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर जागोजागी लहान-मोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या साईट पट्ट्याही दोन ते तीन फूट खचल्याने अपघात नित्याचे झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कर्जत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालविताना चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. मध्यंतरी रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र, ते काम निकृष्ट झाल्याने पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने नेहमीच पंक्चर होतात. या मार्गाने शाळकरी मुले, मुली ये-जा करतात.
याच रस्त्यावर रत्नदीप मेडिकल कॉलेज असून, शेकडो विद्यार्थी या रस्त्याने ये-जा करतात. या मुलांना दररोज खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. चारचाकी, दुचाकी वाहने अतिशय संथ गतीने चालवावी लागतात. या खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालक पडून जखमी झाले आहेत. या रस्त्याचे एकदाच डांबरीकरण झालेले आहे. त्यानंतर मात्र या रस्त्याला एकदाही डांबर लागले नाही. असे असूनही खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभाग टाळाटाळ करत आहे.
या रस्त्यावर सध्या 4 ते 5 इंचाचे खड्डे पडले आहेत. शहरातून जाणाऱ्या विविध ठिकाणी असलेल्या खराब रस्त्यांची दुरुस्ती नेमकी केव्हा होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. रस्त्याविषयी सत्ताधारी पक्षाचे तसेच विरोधी पक्षाचे नेते एक साधे निवेदन, आंदोलन करायलाही पुढे येत नाहीत.
याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागही या कडे लक्ष देत नाही. त्यामुळे वाहनचालकांना खड्डेमय रस्त्यावरून सतत जा-ये करावी लागते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या ठिकाणी नेहमीच अपघात घडत आहेत. याकडे कोणाचेच लक्ष नाही. या रस्त्याकडे कुणी लक्ष देईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.