जामखेड : जामखेड तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार दररोज समोर येत असून शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोरून जाणाऱ्या विद्युत तार खाली असलेल्या गाड्यावर पडली. सुदैवाने खाली कोणी नसल्याने जिवीतहानी टळली आहे. हा प्रकार घडल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी लगेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती कळवली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तार पुन्हा जोडुन दिली. मात्र महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सर्व सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे.
जामखेड शहरासह आसपासच्या परिसरात गेल्या चार ते पाच पाच दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. शहरातील एका ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. ट्रान्सफॉर्मरमधला बिघाड दुरुस्थ होतो न होतो तो पर्यंत विजेची तार तुटल्याने या भागातील वीज खंडित झाली आहे.
गेल्या काही दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. अचानक वीज खंडित होत असून रात्री-बेरात्री कधीही वीजपुरवठा बंद होतो. विजेचा हा खेळखंडोबा सुरू असला तरी वीज बिले मात्र वाढीव येत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वीज पुरवठा अनेकवेळा खंडित करण्यात येत असून त्याची योग्य कारणे सांगण्यासाठी कोणीही सक्षम अधिकारी जबाबदारीने पुढे येत नाही. दूरध्वनीवर संपर्क केला असता महावितरण चे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.