जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात विरोधकांना सुरुंग लावण्यात यश मिळाले आहे. मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण हे 76 मतांनी विजयी झाले आहे. तर एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांना निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी,”आम्हाला परभव मान्य आहे, पण विरोधकांनी खोक्याची ताकद लावून निवडणूक जिंकली असल्याचा आरोपही यावेळी केला आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलच्या पराभवानंतर एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी हा पराभव मान्य असल्याचे सांगत विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली. त्यापर्यंत आम्ही गेलो नाही. खोक्याचा दबाव, आर्थिक बळावर विरोधकांनी ही निवडणूक जिंकल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी यावेळी बोलताना केला आहे.
एकनाथ खडसे यावेळी बोलताना, “विरोधी पक्षाकडून खोक्यांसह साम-दाम-दंड भेद नीतीचा वापर केला गेला, त्यामुळेच आम्हाला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. मात्र पराभव शेवटी पराभव असतो, तो आम्हाला मान्य आहे.” तसेच, यावेळी बोलताना एकनाथ खडसेंनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं.”असे म्हटले.
तसेच पुढे बोलताना,”नव्यानं निवडून आलेल्या संचालकांनी चांगल काम करून दाखवावं ही अपेक्षा आहे. ही निवडणूक लागली असताना तिला ब्रेक दिला गेला, नंतर पुन्हा निवडणूक जाहीर केली, असं राज्यात पहिल्यांदाच घडलं आहे. या निमित्तानं आम्हाला गाफील ठेवण्यात आलं आहे. या निवडणुकीत आम्ही निवडून येऊ अशी परिस्थिती होती. आम्ही सत्तेवर असताना चांगल्या प्रकारे आणि पारदर्शी पणानं संघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असला तरी कमी मताच्या फरकानं अनेक जागा गेल्या आहेत. आमच्या विरोधात दोन सत्ताधारी मंत्री, दोन खासदार, आमदार एवढे जण होते. त्याचाही विचार केला गेला पाहिजे, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. भाजप सोडल्यामुळे आमची माणसं त्यांनी त्यांच्याकडे फोडल्याचं पाहायला मिळतंय.”, असे सांगत झालेला पराभव आपल्याला मान्य असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.