नागपूर – पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, पण संविधान बदलणं नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, असं म्हणत कवाडे यांनी इराणी यांना लक्ष्य केलं. जयदीप कवाडे नागपूर येथे माजी खासदार व काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्रचार सभेत बोलत होते. विशेष म्हणजे जयदीप कवाडेंचे भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी कवाडेंना शाबासकी देत कौतुकही केले. कवाडे यांच्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे तसेच जयदीप यांच्या या आक्षेपार्ह भाषणानंतर त्याच्यांवर सर्वच स्तरातून टीका होत आहे.