नवी दिल्ली – मोदी सरकारने सैन्यभरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला असणारा विरोध कॉंग्रेसने तीव्र केला आहे. त्यातून त्या पक्षाने जय जवान मोहीम हाती घेतली आहे.कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेवेळी पश्चिम बंगालमध्ये मोहिमेचा प्रारंभ केला. अग्निपथ योजनेमुळे आधी निवड झालेल्या तरूणांची भरती रखडली. त्यांच्यावरील अन्याय दूर करून न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा असल्याचे राहुल यांनी म्हटले.
जय जवान मोहीम तीन टप्प्यांत चालवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ ते २८ फेब्रुवारीदरम्यान जनसंपर्कावर भर देण्यात येईल. त्यानंतर ५ ते १० मार्च या कालावधीत सत्याग्रह आणि १७ ते २० मार्चदरम्यान पदयात्रा असे मोहिमेचे स्वरूप असेल. लष्कर, हवाई दल आणि नौदल सेवेसाठी २०१९ ते २०२२ या काळात सुमारे १.५ लाख तरूणांची निवड करण्यात आली. मात्र, त्यांना अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीमुळे रूजू करून घेण्यात आले नाही, असा दावा कॉंग्रेसने केला आहे.
जय जवान मोहिमेची माहिती देण्यासाठी पवन खेडा आणि इतर नेत्यांनी दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्या नेत्यांनी अग्निपथ योजना देशाच्या हिताची नसून तरूणांच्या आकांक्षा चिरडणारी असल्याचा आरोप केला. कंत्राटी सैनिकांचा समावेश असणारे सैन्य देशाला परवडणारे नाही. तशा सैन्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल. त्याशिवाय, अग्निपथ योजनेनुसार भरती होणाऱ्या अग्निवीरांना रोजगाराची गॅरंटी नसेल.
रशिया खासगी सैन्याच्या माध्यमातून लढत असल्याने नियमित स्वरूपाचे लष्कर असणाऱ्या युक्रेनचा पराभव करू शकले नाही. अग्निपथ योजनेचे स्वरूप खासगी सैन्यासारखेच आहे, अशी भूमिका कॉंग्रेस नेत्यांनी मांडली.