सध्या पाऊस धो धो पडत आहे. ऐन पावसाळ्यातील जून-जुलै महिना असावा असे वातावरण आहे. दसरा गेला, निवडणुका झाल्या, दिवाळी आली आहे. दिवाळी हा वर्षाचा सर्वात मोठा हर्षाचा, सर्वाधिक आनंदाचा सण, निदान पूर्वी तरी होता. आमच्या शालेय जीवनात. तेव्हा दिवाळीत पाऊस पडायचा, पण तुरळक, उगाच चार शिंतोडे अंगावर उडवावेत आणि तेही आल्हाददायक वाटावेत असे. आता मात्र तसे नाही. दिवाळीचे नाव बदलून “दिपावसाळी’ करावे असे वातावरण आहे. तशा पोस्ट सुरूही झाल्या आहेत. दिवाळीचे चार-पाच दिवस म्हणजे- वसुबरसात, धनछत्रयोदशी, लक्ष्मीभिजन, ओलीप्रतिपदा आणि भाऊभीज… असे ओलेचिंब करणारे बनले आहेत. दिवाऴीचा फराळ सादळून टाकणारे.
खरं तर पूर्वीची दिवाळी म्हणज़े भली मोऽऽठ्ठी सुट्टी… डबे भरभरून फराळाचे पदार्थ-जे सुटी संपेपर्यंत संपायचे नाहीत, दिवाळी म्हणजे वडिलांनी मोठी पिशवी भरून आणलेले फटाके, फुलबाजे (छोटेमोठे, साधे-तडतडे), वेगवेगळ्या प्रकारच्या पिस्तुलांसह टिकल्या, लख्ख उजेड देणाऱ्या त्या कसल्यातरी तारा-त्यांना इलेक्ट्रिक तारा म्हणायचो, सुरनळ्या, भुईचक्रे, वेगवेगळ्या आकाराचे-बहुतेक मातीच्या छोट्या मडक्यासारख्या भांड्यातले भुईनळे, लवंगी आणि दुसऱ्या मोठ्या फटाक्यांच्या माळा-फटाक्याची अखंड माळ एकदम लावायची किंवा मग फटाक्याची माळ सोडवून सुटे केलेले फटाके गेलेल्या फुलबाज्याच्या तारेत अडकवून पणतीवर धरून एक एक करून वाजवत बसायचे. असे सुटे फटाके वाजवतानाही गंमत वाटायची, त्यानंतर लक्ष्मी बार, मधे वात असलेले डबल बार, सुपाऱ्या किंवा चिडिया, बाण आणि भरपूर धूर सोडणाऱ्या त्या सापगोळ्या! अगदी लहानपणी तुडतुडी नावाचा एक प्रकार होता, नंतर तो गायबच झाला. यापैकी काही नग केवळ लहान मुलांसाठी असायचे आणि वर्ळीं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवे कपडे! त्याकाळी दिवाळीला सर्वांना अगदी हुकमी नवे कपडे मिळत (किंवा मग एखादे लग्नकार्य वगैरे असेल तर.) बाकी वर्षभर जून महिन्यातील शाळेच्या युनिफॉर्मशिवाय नवे कपडे हा प्रकार विरळाच. या सर्व गोष्टींमुळे दिवाळीचे मोठे अप्रूप होते.
आजच्या काळात यातील कशाकशाचे कौतुक राहिले आहे? फटाके-वर्षभर वाजत असतात. गणपती, नवरात्र, कोणाचे वाढदिवस, लग्न, जिंकलेली निवडणूक, खास करून पाकिस्तानबरोबर जिंकलेला एखादा क्रिकेट सामना… फटाके वाजतच असतात. आणि त्यांच्या भल्या मोठ्या माळा असतात-अगदी या चौकापासून त्या चौकापर्यंत पसरणाऱ्या, त्या एकदा लावल्या की इतक्या वाजत राहतात, की ऐकून कान बहिरे होतात की काय असे वाटत राहते. संपायची वाट पाहिली तरी संपता संपत नाहीत आणि नंतर एकदाच्या संपून गेल्या, तरी बराच वेळ कानात आवाज घुमत राहतो. मात्र अशा प्रसंगी आकाशात आवाजासह चमचमणारा तारकांचा वर्षाव-तो अगदी खरोखरंच नेत्रदीपक! पाहावासा वाटणारा.
आजच्या काळात गोडधोडही वर्षभर चालूच असते, विशेषत: रेडीमेड आणि आता तर दिवाळीला तर मिठाईऐवजी चॉकलेटवरच भागवले जातात. पूर्वीसारखे दोनचार प्रकारचे (बुंदीचे, मोतीचूर, रवा, बेसन आदी) लाडू, कच्च्या-भाजक्या-नायलॉनच्या पोह्यांचा चिवडा, चकल्या, शेव, कडबोळे, आणि लक्ष्मीपूजनासाठी खास असणारे तुपातील अगदी खुसखुशीत मधुर अनारसे! हे सारे घरी बनवणे आता दुर्मीळ झाले आहे.
नव्या कपड्यांचे तर काहीच कौतुक नाही. वर्षभर ऑनलाइन-ऑफलाइन कपड्यांची खरेदी चालूच असते. कपाटात ठेवायला जागा नसते. आजकालचे कपडेही असे असतात, की फाटता फाटत नाहीत आणि फाटक्याचीही फॅशन बनते. तेव्हा दिवाळीची ही अशी काही वैशिष्ट्ये आता ऑब्सोलेट की काय म्हणतात ना, तशी कालबाह्य झालीत.
आता दिवाऴीत पूर्वी सारखी बोचरी थंडीही पडत नाही. पूर्वी पहाटे अंथरुणातून बळेच उठवावे लागायचे. पण उटणे लावून कडकडीत पाण्याने आंघोळ केली, की एकदम तरत्री यायची. दिवाळीच्या सणाच्या चार दिवसांचे मात्र महत्त्व वाटते, पण त्या प्रमाणात मात्र नाही. आता सर्वात जास्त महत्त्वाचा झालाय लक्ष्मीपूजनाचा दिवस.
लहानपणी किंवा थोडे मोठे होईपर्यंत दिवाळीतील सर्वात आवडता दिवस कोणता असेल, तर तो भाऊबीज! भाऊबीजेला बहिणीकडून मग ती छोटी असो वा मोठी, उटणे लावून घ्यायचे, मस्त आंघोळ करायची, आणि ओवाळून घ्यायचे… त्यात केवढी माया-आपुलकी होती. ओवाळल्यानंतर खाऊच्या साठवलेल्या पैशातून आणलेली एखादी वस्तू-कधी कधी तर ती साधी रिबनही असायची-तिला ओवाळणी टाकायची, त्यात केवढा आनंद असायचा. भाऊबीजेला बहिणीकडून ओवाळून घेताना मोठे झाल्यासारखे वाटायचे. आता वाटते, मोठे झालो नसतो तर बरे झाले असते. लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणीच्या आठवणीने डोळे पाणावायचे, पण ते दाखवण्यापेक्षा लपवावेसे वाटायचे.
आता मोठेपणी लहानपणीच्या निर्व्याज दिवसांची आठवण काढायची आणि म्हणायचे,
आली दिवाळी दिवाळी… हवा आहे पावसाळी
नदीनाल्यांना पूर… रस्ते, गटारे तुंबलेली
योगिता जगदाळे