मुंबई – एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचे हा निर्णय माझा होता. हा काही पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेला निर्णय नाही. मी प्रस्ताव मांडला होता. वरिष्ठांनी कालांतराने तो मान्य केला. मी मुख्यंमत्री होणार नाही हे मला पहिल्या दिवसापासून माहिती होते.
पण मी उपमुख्यमंत्री होईन हे शेवटच्या दिवसापर्यंत मला माहिती नव्हते. पक्षाने मला सांगितले की सरकार चालवायचे आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. हा माझा सन्मानच आहे, असा दावा उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, पक्षाला जेव्हा वाटेल, तेव्हा मला केंद्रात बोलवतील. ज्यांना वाटतेय की फडणवीस राज्यातून दिल्लीत गेले म्हणजे ‘बला’ टळली त्यांना मी सांगेन, तुम्ही देव पाण्यात ठेवून बसलात, तरी ‘बला’ काही टळत नाही, असे म्हणत महाराष्ट्रात राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
माझ्या पक्षाने उद्या मला सांगितले की तुमचे काम संपले, आता तुम्ही घरी बसा, तर मी घरी बसेन. कारण मी जे काही आहे, ते माझ्या पक्षामुळे आहे. माझ्या नावामागचे भाजप काढून टाकले तर मी शून्य आहे.
त्यामुळे पक्ष जे सांगेल, ते मी करेन असे म्हणत आपण पक्षादेश पाळत काम करणार असल्याचे स्पष्ट केले. तर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा स्तरावर बोलताना ते म्हणाले की, हा साथीचा रोग आहे. हा एकाला झाला की दुसऱ्याला होतो.
संजय राऊतांना टोलाहा
करोनासारखाच आहे. मूळ विषाणू जोपर्यंत आपण संपवणार नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. तो मूळ विषाणू कुठे आहे हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत अप्रत्यक्ष संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
रोज सकाळी हा विषाणू पसरवण्याचे काम माध्यमांकडून केले जाते, असा हल्लाबोल करतानाच लोक आत्ताही कंटाळलेच आहेत. एक दिवस लोक त्यांना पाहणे बंद करतील. मग तेव्हा माध्यमंही त्यांना दाखवणे बंद करतील. माध्यमांनी दाखवणे बंद केले की ते बोलणं बंद करतात असा टोला त्यांनी लगावला आहे.