पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजप या वळणावर गेल्यानंतर ही निवडणूक चुरशीची होणार, हे निश्चित झाले होते. त्यामुळे मतमोजणी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी ठरणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते.
हेच चित्र मतमोजणीच्या आठव्या फेरीपर्यंत कायम राहिल्याने कसब्यात मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत सगळ्या राज्याची उत्सुकता शिगेला लागली होती. मात्र 20 फेऱ्यांच्या मतमोजणीत आठव्या फेरीपासून धंगेकर यांना निर्णायक मते मिळत गेल्याने शेवटच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम ठेवत त्यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा 10 हजार 915 मतांनी पराभव केला. या निकालाने भाजपचा “निकाल’, तर कॉंग्रेसला “सुकाळ’ अशीच प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटली.
यावरून आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून तर हा तर हुकूमशहा आणि ठोकशहांच्या तोंडावर मारलेला तमाचाच आहे, असं म्हटलं आहे. तसेच भाजपचा पराभव करण्याचा मंत्र कोणता आहे? कसब्याच्या विजयाचा अर्थ काय? हे दैनिक ‘सामना’तून स्पष्ट करण्यात आलं आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख
कसब्यातील भाजपचा हा पराभव केवळ कसब्यापुरताच मर्यादित नाही तर या निकालाने संपूर्ण महाराष्ट्रालाच भाजपचा भ्रमाचा भोपळा कसा फोडायचा याचा उत्तम संदेश दिला आहे. महाराष्ट्रात आणि देशातही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किती तीव्र असंतोष खदखदत आहे, हेच कसब्याच्या निकालाने दाखवून दिले. एकास एक उमेदवार दिला तर भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे. जागरूक झालेल्या मतदारांनी त्यांचे काम चोख बजावले. आता जबाबदारी विरोधी पक्षांची आहे. आपल्यात वजाबाकी होऊ न देणे आणि मतांची बेरीज वाढवणे हाच भाजपच्या पराभवाचा एकमेव मंत्र आहे. कसब्याच्या निकालाचा हाच अर्थ आहे. कसब्याच्या निकालाने पुण्यात जल्लोष सुरू झाला आहे. महाराष्ट्रात आणि देशातही 2024 पर्यंत हा जल्लोष असाच सुरू राहील!
पुण्यातील कसबा हा तब्बल 28 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला गड महाविकास आघाडीने उद्ध्वस्त केला आहे. कसबा आणि चिंचवड या पुण्यातील दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. मुक्ताताई टिळक आणि लक्ष्मण जगताप या भाजप आमदारांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे ही पोटनिवडणूक झाली आणि यातील कसब्याची अत्यंत प्रतिष्ठेची जागा गमावण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षावर आली. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा दारुण पराभव केला, तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी या केवळ तिरंगी लढतीमुळे विजयी झाल्या. तिथेही कसब्याप्रमाणेच दुरंगी लढत झाली असती तर ‘खोकेशाही’च्या नादाला लागलेल्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातच काय, देशातही तोंड दाखवायला जागा राहिली नसती. मात्र अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते, ते कसब्याच्या निकालाकडे. कारण 1995 पासून ते आजतागायत सलग 28 वर्षे या मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व होते. आधी गिरीश बापट आणि नंतर मुक्ता टिळक येथून निवडून गेल्या. अर्थात, भाजपच्या आजवरच्या कसब्यातील विजयामध्ये त्या वेळी युतीमध्ये असलेल्या ‘ओरिजनल’ शिवसेनेचे योगदानही तेवढेच महत्त्वपूर्ण होते. शिवसैनिकांनी त्या वेळी प्रयत्नांची पराकाष्ठा केली नसती, तर भाजपचा हा कपोलकल्पित गड कधीच धराशायी पडला असता. असो, आता ‘डुप्लिकेट’ शिवसेनेच्या साथीने भारतीय जनता पक्ष पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि तोंडावर आपटला. हे होणारच होते. कसब्याचा
लागणार होता. रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असले तरी महाआघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी या पोटनिवडणुकीत भाजपला धडा शिकवण्यासाठी जिवाचे रान केले व ‘मविआ’च्या भक्कम एकजुटीपुढे भाजपच्या हेमंत रासने यांचा निभाव लागला नाही. जवळपास 11 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. कसब्यातील भाजपचा हा पराभव केवळ कसब्यापुरताच मर्यादित नाही तर या निकालाने संपूर्ण महाराष्ट्रालाच भाजपचा भ्रमाचा भोपळा कसा फोडायचा याचा उत्तम संदेश दिला आहे. मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये तथाकथित महाशक्तीला पराभूत करण्याचा उत्तम वस्तुपाठ कसब्याच्या निकालाने घालून दिला आहे. भाजपचा हा पराभव सामान्य नाही. बेइमानी करून व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून राज्यात घडवलेला सत्ताबदल जनतेच्या किती डोक्यात गेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनमानस किती प्रक्षुब्ध झाले आहे, याचा अंदाज भाजपच्या नेतृत्वाला आधीच आला होता. तरीही नसलेल्या बेटकुळय़ा फुगवून ‘हा आमचा पारंपरिक बालेकिल्ला आहे,’ अशा फुशारक्या भाजप नेते एकीकडे मारत होते आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्याचे अख्खे मंत्रिमंडळ प्रचारासाठी कसब्यात तळ ठोकून होते. मुख्यमंत्र्यांसह मिंधे मंडळाचा रोड शो झाला व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील निवडणुकीदरम्यान पुण्यात येऊन गेले. पण त्याचा
पेठांतील मतदारांवर
काडीमात्र परिणाम झाला नाही. पराभव समोर दिसू लागला तसा ‘धनशक्ती’चे ब्रह्मास्त्रही ‘महाशक्ती’ने वापरून पाहिले. तरीही शेवटी भ्रमाचा भोपळा फुटायचा तो फुटलाच! राजकारणातील नीतिमत्ता विकून खाणाऱ्या सत्तांधांना शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि रविवार व शुक्रवार पेठांतील जनतेने मोठीच अद्दल घडवली. महाराष्ट्रात जी गद्दारी झाली, त्या गद्दारीचे मुस्काट फोडणारे परिवर्तन कसब्याने घडवले. आधी अंधेरीच्या पोटनिवडणुकीत मशाल पेटली, त्यापाठोपाठ शिक्षक व पदवीधर मतदारसंघांतील निवडणुका व आता कसब्यामध्ये पडलेली विजयाची ही ठिणगी भविष्यात महाराष्ट्र व देशातही परिवर्तनाचा वणवा पेटवल्याशिवाय राहणार नाही. कसब्याचा निकाल म्हणजे लोकशाहीचे हत्याकांड घडवून गद्दारांच्या खोकेशाहीला राजवस्त्रे देणाऱ्या हुकूमशहा व ठोकशहांच्या तोंडावर जनतेने मारलेला तमाचाच आहे. महाराष्ट्रात आणि देशातही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किती तीव्र असंतोष खदखदत आहे, हेच कसब्याच्या निकालाने दाखवून दिले. एकास एक उमेदवार दिला तर भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे. जागरूक झालेल्या मतदारांनी त्यांचे काम चोख बजावले. आता जबाबदारी विरोधी पक्षांची आहे. आपल्यात वजाबाकी होऊ न देणे आणि मतांची बेरीज वाढवणे हाच भाजपच्या पराभवाचा एकमेव मंत्र आहे. कसब्याच्या निकालाचा हाच अर्थ आहे. कसब्याच्या निकालाने पुण्यात जल्लोष सुरू झाला आहे. महाराष्ट्रात आणि देशातही 2024 पर्यंत हा जल्लोष असाच सुरू राहील!