मुंबई : देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेस नेतृत्वावरुन पक्षात वाद रंगला असल्याचे दिसत आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पक्षाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. काँग्रेसची सूत्र तरुणांच्या हाती देणे पक्षाला महागात पडले असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला सुशीलकुमार यांनी मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते. सुशीलकुमार शिंदे यांनी मुलाखतीदरम्यान सोनिया गांधींच्या नेतृत्वावर आपला विश्वासदेखील यावेळी व्यक्त केला. मात्र गांधी कुटुंबाव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीने नेतृत्व करण्याच्या मुद्यावर त्यांनी बोलले टाळले आहे. ताईच पाच राज्यातील पराभवाला एकट्या राहुल गांधीना दोष देणे शक्य नाही, पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे. लोकांना बदल हवा होता,” असे सुशीलकुमार शिंदेंनी म्हटले आहे.
“तरुणांकडे नेतृत्व द्यायचं, बदल करायला सांगायचं असा प्रयत्न करुन पाहिला आणि तिथेच गफलत झाली, असे मला वाटत. मात्र मी पक्षावर अशी थेट टीका करू शकणार नाही. कारण ही प्रक्रिया आहे. आम्ही १० वर्षांची सत्ता भोगल्याने आम्ही इतके सक्रीय नव्हतो. संघटना बांधणी व्हायला हवी होती ते झालं नाही,” अशी कबुली सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
तसेच “राहुल, प्रियंका यांच्याशी आमच्या जेव्हा बैठका होतात त्यावेळी बोलतो. पण गेल्या काही वर्षात आमची भेट झालेली नाही. मला सोनिया गांधी आणि राहुल, प्रियंकाही बोलवतात पण आजकाल मी काही उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नसून आता नव्या पिढीच्या हातात सगळं सोपवलं आहे”. असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
“आम्ही सर्वजण गांधी कुटुंबाला स्वीकारणारे आहोत. त्या घराण्यातून आलेल्या लोकांचं नेतृत्व आम्हाला मान्यच आहे. ते कोणी करावं हे कमिटी ठरवेल,” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. “गांधी घराण्यात सध्या सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका आहेत. या तिघांमुळे घराणं टिकून आहे. त्या घराण्यातून जो विचार येतोय तो काँग्रेसचा आहे. एखाद्या वेळी चूक झाली असेल पण सुधारणा होईल,” असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.