शिंदे वासुली – ज्यांच्या त्यागातून भामा-आसखेड धरण उभे राहिले त्या निष्पाप भूमिपुत्र शेतकऱ्यांना जेलमध्ये जावे लागणे ही खेड तालुक्याच्या इतिहासातील सर्वांत वाईट घटना असून सर्वच राज्यकर्त्यांचे हे अपयश आहे. शेतकऱ्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी संतप्त भावना जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी व्यक्त केली.
करंजविहिरे येथे जिल्हा परिषद निधीतून 12 लाख रूपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी बुट्टे पाटील बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, सरपंच उज्वला खेंगले, उपसरपंच कैलास बोराडे, सयाजी कोळेकर, शांताराम कोळेकर, रमेश कोळेकर, गणपत कोळेकर, सुदाम कोळेकर, रामदास कोळेकर, मल्हारी कलवडे, संतोष कलवडे, सुरेखा बोऱ्हाडे, भाऊ देशमुख आदी उपस्थित होते.
शरद बुट्टे पाटील म्हणाले की, संकटकाळात माझ्या कुटुंबावर आलेला प्रसंग आणि त्यातून आमच्या आईचे झालेले निधन यामुळे मी एक महिना सार्वजनिक जीवनात नव्हतो त्यामुळे या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करू शकलो नाही याची खंत वाटते.
पुढील काळात भामाआसखेड धरणग्रस्तांच्या आंदोलनाची जी दिशा असेल त्याप्रमाणे सहभागी असेल व शेतकऱ्यांना भक्कम साथ देणार, असे आश्वासन शरद बुट्टे पाटील यांनी दिली.