लाहोर – अमेरिका किंवा भारतामुळे पाकिस्तानचे नुकसान झाले नाही. तर पाकिस्ताननेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाच्या कार्यकर्त्यांशी वार्तालापामध्ये ते बोलत होते.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती खराब होण्यास भारत, अमेरिका किंवा अफगाणिस्तान जबाबदार नाही. त्याला आपणच जबाबदार आहोत. लष्कराने आपल्या लोकनियुक्त सरकारला २०१८ मध्ये हटवून सत्ता काबीज केली. त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था बिघडली, असे शरीफ म्हणाले.
लष्करी हुकुमशहांना वैध ठरवल्याबद्दल त्यांनी देशाच्या न्यायाधीशांवरही टीका केली. लष्करी हुकुमशहांनी राज्यघटनेचे उल्लंघन केले. तरी न्यायाधीशांनी त्यांची राजवट वैध ठरवली होती. या न्यायाधीशांनी तर राज्यघटना विसर्जित करण्याचा निर्णय देखील वैध का ठरवला होता, असा प्रश्नही शरीफ यांनी उपस्थित केला.
आपले सरकार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल आयएसआयचे तत्कालिन प्रमुख जनरल फैज हमिद यांच्यावरही शरीफ यांनी कठोर टीका केली. जनरल फैज हमिद यांच्याविरोधातील प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुरू केली गेल्याचेही शरीफ यांनी म्हटले आहे.
१९९९ आणि २०१७ मध्ये लष्कराला आपला माणूस (इम्रान खान) पंतप्रधानपदी बसवायचा होता. म्हणूनच आपल्याला सत्तेवरून हटवले गेले, असा आरोपही शरीफ यांनी केला.