मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असताना मी मुख्यमंत्री झालो. आता पुन्हा त्यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत असताना मला उमेदवारी मिळाली.
माझ्या मते, आमच्या दोघांचे स्टार कुठेतरी मिसमॅच होत आहेत, असे भाष्य माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते अशोक चव्हाण यांनी राणे यांच्या राज्यसभेच्या कापल्या गेलेल्या उमेदवारीवर बोलताना केले आहे.
चव्हाण यांनी १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस सदस्यत्व व आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपत प्रवेश केला. अखेर भाजपने १४ फेब्रुवारी रोजी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा राज्यसभेच्या उमेदवारीचा पत्त कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यावर बोलतान चव्हाण पुढे म्हणाले, राणे यांचा बऱ्याच वर्षांनी परवा मला फोन आला होता. भाजपात आल्याबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले. त्यामुळे माझे येणे आणि त्यांची राज्यसभा जाणे यात कोणताही संबंध नाही.
मला राज्यसभेवर पाठवण्याचे ठरले होते असे मी म्हणणार नाही. पण माझ्या अनुभवाचा फायदा राज्यसभेत व्हावा असे त्यांना वाटले असेल. त्यामुळेच त्यांनी मला संधी दिली असेल, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.
मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमध्ये काम केले. मी २ वर्षांपूर्वी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही. मी शेवटच्या दिवशी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बैठक घेतली आणि सायंकाळी गाडी पकडून मुंबईला आलो.
पक्षाला अधिक वेळ देण्यासाठी त्यांनी मला राज्यसभेवर पाठवले. त्यांना मी मराठवाड्यात प्रचार करावा असे वाटते. त्यात काहीही गैर नाही, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.
पास्ट इज पास्ट
मी मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी मी त्यांना पक्ष न सोडण्याची विनंती केली होती. पण ते गेले आणि परत आले. ते काम करत आहेत.
पण पास्ट इज पास्ट. भूतकाळ हा भूतकाळच असतो. आता निवडणूकच काय ते ठरवेल. नानांविषयी काही असेल तर ते लोक ठरवतील, असे चव्हाण म्हणाले.