अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर वाईत शांतता कमिटीची बैठक
वाई – अयोध्या येथील रामजन्मभूमीच्या वादग्रस्त जागेबाबत अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल कोणत्याही बाजूने लागता तरी त्याचा सन्मान करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन वाईचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा संभाव्य निकाल आणि त्यानंतर साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या हॉलमध्ये शांतता कमिटीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, काशिनाथ शेलार, चरण गायकवाड, राजेश गुरव, दीपक ओसवाल, प्रदीप चोरगे, आनंदराव लोळे, मोअज्जम इनामदार व नागरिक उपस्थित होते.
टिके म्हणाले, सोशल मीडियावर पोस्ट टाकणे, पत्रकबाजी, बॅनरबाजी अथवा फटाके वाजवून जल्लोष करू नयेत. सामाजिक सलोखा व शांतता बिघडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. शहरातील सर्व भागांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे आमचे लक्ष राहणार आहे. समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
निकाल जाहीर झाल्यानंतर भडक वक्तव्ये करणे, मिरवणुका काढणे, जमाव जमवण्यावर बंदी असून सोशल मीडियावरून अफवा पसरवू नयेत. अशी कृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. गैरकृत्ये करणाऱ्यांबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी. शांतता कमिटीचे पुनर्गठण करण्यात येणार आहे. बैठकीत अनेक नागरिकांनी शहरातील वाहतूक समस्यांकडे पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र यावे. पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून सूचना करूनही चौकांमध्ये वेडीवाकडी वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी.
पोलीस व नागरिक यांच्यात समन्वय असावा. शांतता समितीची बैठक दरमहा घ्यावी. शहरातील प्रत्येक प्रभागात व प्रत्येक गावात तरुणांची पोलीस मित्र म्हणून नियुक्ती करावी, अशा सूचना नागरिकांनी केल्या.