नागपूर/नवी दिल्ली : राज्यतील राजकारणात मी परण्याची कोणतीही शक्यता नाही. राज्यातीलक सत्तेचा पेच प्रसंग लवकरच सोडवला जाईल. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपा महायुतीचे सरकार येईल. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी गडकरी गुरूवारी तातडीने नागपुरात दाखल झाले. तेव्हा विमानतळावर पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यावेळी गडकरी म्हणाले, मीॅ दिल्लीत आहे. राज्याच्या राजकारणात परत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्यातील सत्तेचा पेच लवकरच सोडवला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान नवी दिल्लीतून हाती आलेल्या वृत्तनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी तातडीने रवाना झाले. त्यामुळे शिवसेनेची समजूत काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणार की महाराष्ट्रात भाजपाचा कप्तान बदलणार? अशा चर्चांना राजधानीतील राजकीय वर्तुळात वेग आला.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी बुधवारी भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, यामुळे राजकीय वर्तुळात राज्यातील सत्ता समिकरणे बदलणार असल्याची हूल राजधानीत उठली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृतवाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीतून नितीन गडकरी यांना जवळपास बेदखल केले होते. गडकरी यांच्या केवळ विदर्भात काही ठिकाणी सभा ठेवून त्यांचे पंख कापण्याचे प्रयत्न करतानाच देवेंद्र फडणवीस यांनाच राज्याचे भाजपाचे एकमुखी नेतृत्व म्हणून पुढे आणल्याचे राजकीय निरीक्षकांचे कमत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाला युती करूनही अपेक्षित यश मिळवता आले नाही.
शिवसेनेच्या काही नेत्यांनी अशा स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस नेत्यांशी संपर्क साधला. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असूनही आणि मतमोजणी होऊन पंधरवडा उलटूनही भाजपाला सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला नाही. राज्यातील बदलत्या वातावरणाचा अंदाज आल्याने निवडणुकीपुर्वी केले तसे घाऊक पक्षांतर करण्यात अपयश येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 5) रात्री सरसंघचालकांची नागपुरात भेट घेतली. त्यावेळी भागवत यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती कायम ठेवली पाहीजे, असे मत व्यक्त केले.
शिवसेना युतीच्या मुद्द्यावर कोणताच प्रतिसाद देत नसल्याने भाजपाची पंचाईत झाल्याचे मानले जाते. त्यामुळे राज्यपालांची भाजपा शिष्टमंडळ घेणार असलेली भेट सायंकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. भागवत यांच्या सुचनेनुसार गडकरी नागपूरला चर्चा करण्यासाठी रवाना झाले असल्याचे भाजपातील अतिवरीष्ठ सूत्रांनी सांगितले. नागपुरातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गडकरी यांचे उध्दव टाकरे यांच्याशी उत्तम संबंध आहेत. हे नाते त्यांनी जपले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी गडकरी यांना पाठवण्यात येईल अशी अटकळ बांधण्यात येत आहे.