मुंबई :- मणिपुरातील नागरिकांच्या वेदना जाणून घेणे हा केवळ दिखावा नाही, ते राजकीय पक्षांचे कर्तव्यच आहे, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूर दौऱ्यावर गेले आहे, त्याला भाजपने हा केवळ दिखावा आणि राजकीय पर्यटन असल्याचे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी हे प्रतिपादन केले.
मणिपुरात जातीय संघर्ष सुरू झाल्यापासून पंतप्रधानांनी राज्याला भेट दिली नाही किंवा त्यावर कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. मणिपूर हा देशाचा एक भाग आहे. राज्यातील लोक हे भारताचे नागरिक आहेत. पंतप्रधानांनी भेट दिली नाही तर मग विरोधकांनी तिथे जाणे हे आमचे कर्तव्य आहे, असे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राऊत म्हणाले, आमच्या लोकांनी राज्यातील जनतेशी बोलून त्यांच्या वेदना समजून घेतल्या. देशातील नागरिकांच्या वेदना समजून घेणे आणि वाटून घेणे याला दिखावा म्हटल्यास, इतके क्रूर राजकारण आपण पाहिले नाही, असे मला वाटते.