मुंबई – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज एका मुलाखतीदरम्यान, ‘दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल भाजप सरकारला दोष देणं योग्य नाही. यासाठी समाजाची धारणा दोषी आहे’ असं वक्तव्य केलं. यावेळी बोलताना आठवले यांनी, काँग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादीचं सरकार असलेल्या महाराष्ट्रातही दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा केला.
ते ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलत होते.
विशेष म्हणजे आठवले यांनी यावेळी दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाब नाकारली नाही. मात्र, अशा घटना केवळ भाजपशासित राज्यांतच नव्हे तर काँग्रेसचं सरकार असलेल्या राजस्थानात आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार असलेल्या महाराष्ट्रातही वाढल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
”नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जेवढ्या मोठ्या संख्येनं लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तो केवळ ब्राह्मणांच्या मतांवर शक्य नाही. भाजपला सगळ्यांनी मतं दिलीत. तो दलित पक्षही आहे, मागासवर्गीयांचा आणि अल्पसंख्यांकाचाही आहे’ असंही रामदास आठवले म्हणाले.
यावेळी बोलताना आठवले यांनी,’आजचा दलित चांगले कपडे परिधान करू लागलाय. तो आज कुणालाही वाकून नमस्कार करत नाही. याच रागातून त्यांच्याविरुद्ध अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.’ असा दावा केला.