नवी दिल्ली – चर्चेविना पास झालेल्या विधेयकावर सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांनी चिंता व्यक्त केली. संसदेत चर्चेविनाच महत्त्वाची विधेयके, कायदे मंजूर होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करत हे योग्य नसल्याचे रमन्ना यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. संसदेतील गोंधळ आणि चर्चेशिवाय काही कायदे मंजूर झाल्याने त्यात त्रुटी असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यसभेत बुधवारी अभूतपूर्व गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले होते. बाहेरून आलेल्या मार्शल्सने विरोधीपक्षांच्या खासदारांना मारहाण केल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. याच गोंधळात विधेयकही पास करण्यात आले.
कोणत्याही कायद्यावर संसदेत चर्चाच झाली नाही, तर कायद्याचा उद्देश, हेतू आणि तो लागू केल्याने होणारे फायदे किंवा तोटे लक्षात येत नाहीत. त्यावर योग्य चर्चा झाली तर त्यातील त्रुटी दूर करणे शक्य असते. योग्य चर्चेशिवाय कायदे मंजूर झाल्याने, त्यातील त्रुटींमुळे न्यायालयात येणाऱ्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे रमन्ना यांनी म्हटलं.
दरम्यान संसदेत पूर्वी विविध कायदे मंजूर करण्यापूर्वी त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येत होती. त्यामुळे त्या कायद्यांबाबत योग्य ती माहिती मिळत होती. फक्त आरोप किंवा प्रत्यारोप न करता कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण आणि ज्ञान वाढवणारी चर्चा होत असे. त्यामुळे कायदा लागू करणे आणि समजणे न्यायालयानांही सोपे जात होते. आता वकिलांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरजही रमन्ना यांनी व्यक्त केली.