पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मराठी अभिजात करायची की आधुनिक करायची, यापेक्षा ती ज्ञानभाषा होणे अगत्याचे आहे. कालानुरूप आपल्याला पुढे जायचे की मागे, हे नेमके ठरवण्याची वेळ आली आहे. अभिजात दर्जा, ज्ञानभाषा हे त्याविना केवळ बुडबुडे आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ भाषातज्ज्ञ समीक्षक आणि लेखक डॉ. मिलिंद मालशे यांनी मंगळवारी येथे केले.
महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या म. सा. पत्रिका या वाङ् मय नियतकालिकातील विसाव्या शतकातील निवडक लेखांचे संकलन असलेल्या अक्षरधन : निवडक महाराष्ट्र साहित्य पत्रिका विसावे शतक या एक हजार पृष्ठांच्या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संशोधन विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून डॉ. मालशे यांच्या हस्ते झाले.
ग्रंथाच्या संपादक डॉ. नीलिमा गुंडी, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ग्रंथासाठी अर्थसाह्य करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आदी या वेळी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. मालशे यांनी मराठी भाषेची सद्यःस्थिती, शासकीय पातळीवरील भाषा कारभारावर भाष्य केले. लिप्यंतर म्हणजेच भाषांतर, असा सरकारचा समज झाला आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये अशी पुस्तके आहेत. महाराष्ट्रात पण वेगळी परिस्थिती नाही. भाषेच्या संदर्भात अडाणी कारभार आहे, असे ते म्हणाले.
डॉ. गुंडी, प्रा. जोशी यांचीही भाषणे झाली. पवार यांनी प्रास्ताविक केले. दीपाली दातार यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथनिर्मितीत योगदान देणाऱ्या प्रदीप खेतमर, आरती देवगावकर यांचा सत्कार करण्यात आला.