मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारख्या उदयोन्मुख नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघात मेहनत घेतली. गेले दोन-अडीच वर्ष मतदारसंघाकडे ते लक्ष देत आहेत. आमच्याकडे नवीन नेतृत्व निर्माण झाले आणि त्यांनी यश संपादित केले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी नगर पंचायत निवडणुकांच्या निकालाबाबत दिली.
काही अनुभवी नेत्यांना त्यांच्या भागामध्ये यश मिळालेले नाही. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्याची कारणे शोधली पाहिजेत. पण लक्षपूर्वक काम केल्यास जनता राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारत आहे, हे स्पष्ट होते, असे नवाब मलिक म्हणाले.
थेट लढत झाली तिथेही भाजपला बीड जिल्ह्यात चार पैकी तीन जागा मिळाल्या. मराठवाडा, कोकण, विदर्भ पाहिला तर भाजपला कुठेही यश मिळालेले नाही. स्वबळावर बऱ्याच ठिकाणी निवडणुका झाल्या आहेत. मत विभाजन होत असताना भाजपला यश मिळत नाही. याचा अर्थ हा आहे की मागील निवडणुकांच्यावेळी भाजप पैशाच्या जोरावर सर्व निवडणुका जिंकत होती, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
आता सत्ता राहिली नाही आणि सत्तेचा दुरुपयोग करता आला नाही त्यामुळे फेअर निवडणूक झाली आणि त्यात भाजपला जनतेने नाकारले आहे, हे स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.