मुंबई – नगर पंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विजयी ठरत आहे. हा पक्ष केवळ दोन-तीन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे, असे सांगणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी चपराक लगावली आहे, असा खोचक टोला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. ग्रामीण विभागात राष्ट्रवादी काँग्रेस खोलवर रुजली आहे. त्यामुळेच नगरपंचायत निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळत आहे, असे ते म्हणाले.
पक्षाचे उदयोन्मुख नेतृत्व रोहीत पाटील यांनी पुढाकार घेऊन घवघवीत यश मिळवले आहे. जयंत पाटील यांनी 10 जागांवर विजय मिळवल्याबद्दल रोहीत पाटील यांचे अभिनंदन केले. याशिवाय पक्षावर जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी जनतेचेही आभार मानले.
प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे. तरुणांच्या मागे जाण्याचा ट्रेंड महाराष्ट्रात असल्याने काही ठिकाणी अपयश आले असले तरी तिथल्या नेत्यांची ताकद कमी आहे, असे बोलून चालणार नाही. यश आणि अपयशाच्या दोन्ही बाजू पाहाव्या लागतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाल्याचे समाधान जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले आहेत. निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे. @NCPspeaks पक्षाला घवघवीत मतदान केल्याबद्दल सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे आभार मानतो. pic.twitter.com/zs4rHt9b09
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 19, 2022
पुढे जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे बळ राज्यात अधिक आहे. त्यामुळे भाजप यापुढे मर्यादित पक्ष राहणार आहे. शिवसेनेमुळे भाजपची ताकद राज्यात वाढली होती. आता शिवसेना वेगळी झाल्यावर भाजपची खरी परिस्थिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा जो प्रयोग केला आहे त्याला प्रतिसाद म्हणून विजयी संख्या येत आहेत. त्यामुळे जनतेनेही महाविकास आघाडीचा प्रयोग स्वीकारला असल्याचे स्पष्ट होते, असे जयंत पाटील म्हणाले.