पाटणा – केंद्र सरकार आणि भाजपविरोधात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची पाटण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी देशभरातील 15 विरोधी पक्ष एकत्र आले होते. या बैठकीनंतर सर्व प्रमुख नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष तयार असून ही वज्रमूठ कायम असेल’, असा विश्वास नितीश कुमार यांनी बैठकीनंतर बोलताना व्यक्त केला.
तसेच, बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून नितीश कुमार यांना यूपीएचे संयोजक बनवण्याबाबत चर्चा झाली. तर, पुढील बैठक 10 ते 12 जुलै दरम्यान शिमल्यात होणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं. या बैठकीत कोण, कुठे लढणार याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आजच्या बैठकीनंतर सर्व विरोधी नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “संपूर्ण देशातील पक्षाचे प्रमुख नेते इथ आले आहे. काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत सर्व एकत्र आले आहे. सर्व वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे सर्वांची विचारधारा देखील वेगळी आहे.
मतभिन्नता देखील असेल. मात्र देश एक आहे. देशाला वाचवण्यासाठी, देशाची अखंडता वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जो देशाच्या लोकशाहीवर आघात करेल त्याचा सर्व मिळून सामना करु. मी स्वताला विरोधक मानत नाही.
जो देशद्रोही आहे, ज्याला देशात हुकूमशाही आणायची आहे त्याच्या विरोधात आम्ही राहू. आता सुरूवात झाली आहे. जेव्हा सुरूवात चांगली होते तेव्हा सर्व गोष्टी चांगल्या होत्यात’. असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या…
“नितीश कुमार यांनी चांगल्या प्रकारे बैठकीचे आयोजन केले आहे. पाटणामधूनच आंदोलन सुरू होते. दिल्लीमध्ये अनेकदा बैठक झाली. पण त्याचा काहीही निष्कर्ष निघाला नाही. आजच्या बैठकीत तीन गोष्टी स्पष्ट झाल्या.
पहिली म्हणजे आपण एक आहोत. दुसरी आपण एकत्र लढू आणि तिसरी म्हणजे भाजप जो पॉलिटिकल अजेंडा आणेल त्याला विरोध करू. आज इतिहासातील मोठा दिवस आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी कलम 370 हटवण्याच्या आम आदमी पार्टीच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्व पक्षांनी केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल यांना पाठिंबा द्यावा असे कॉंग्रेसला सांगितले आहे.