समस्त नागरिकांच्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल
मुंबई – बरोबर 25 वर्षांपूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1995 रोजी व्हीएसएनएल या कंपनीने भारतात इंटरनेट सुरू केले. आता 25 वर्षांत या क्षेत्रात भारताने इतकी मोठी घोडदौड केली आहे की, इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे इंटरनेट येऊन फक्त 25 वर्षे झाली यावर विश्वास ठेवणे अवघड जाते.
साक्षरता वाढलेल्या भारतीयांनी इंटरनेटबरोबरच मोबाइल सेवा स्वीकारून आपल्या जीवनात अमूलाग्र बदल केले आहेत. 1995 पूर्वी अनौपचारिक पद्धतीने काही ब्रोऊझर कार्यरत होते. मात्र, खरी सुरुवात 15 ऑगस्ट 1995 ला झाली. त्याकाळी 9.8 केबीपीएस वेगाच्या 250 तासांच्या इंटरनेट सेवेसाठी 15 हजार रुपये मोजावे लागत. आता भारतीयांना 4-जी स्पीड केवळ वीस रुपये प्रती जीबी दराने मिळतो. हा दर जगात सर्वात कमी आहे. 25 वर्षांत भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या शून्यापासून 60 कोटींवर गेली आहे. जगात इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या 25 वर्षांच्या काळात जगाची काम करण्याची पद्धत बदलली. गुगल हा शब्द आता क्रियापदाप्रमाणे झाला आहे. त्याचबरोबर इंटरनेट आधारित नवे उद्योग आले आणि त्यांनी परंपरागत उद्योगांना बघता बघता मागे टाकले. इंटरनेट आधारित ई- कॉमर्समुळे शहरातील खरेदीचे सर्व निकष बदलले आहे. त्याचबरोबर ओला, उबेर आल्यामुळे प्रवासाची पद्धत बदलली आहे. नेटफ्लिक्सने मनोरंजनाची पद्धत बदलली आहेत. तर स्विगीसारख्या कंपन्यांनी अन्नपदार्थ मागविणे सोपे केले आहे. इंटरनेटमुळे कागदी पैशाचे रूपांतर डिजिटल पैशात झाले आहे. त्यामुळे आपण आहोरात्र पटकन पैशाचे व्यवहार करू लागलो आहोत. इंटरनेटवर आधारित व्हाट्सएप, इंस्टाग्राम, ट्विटर या ऍपमुळे नागरिकांची जनसंपर्काची पद्धत बदलली आहे. त्याचबरोबर बड्या नेत्यांची, अभिनेत्यांची आणि सरकारची संदेश देवाणघेवाणीची पद्धत बदलली आहे.
आज जगातील सर्वात मोठ्या कंपन्या इंटरनेटचा आधार घेऊन काम करतात. फेसबूक, गुगल, ऍमेझॉन या कंपन्या 25 वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हत्या. त्या आता जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आहेत.
आता इंटरनेट आधारित नवे उद्योग विकसित करण्यासाठी भारताबरोबरच जगात अनेक स्टार्ट अप् चालू आहेत. या स्टार्ट अपमधून विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानातून नागरिकांना आणि इतर कंपन्यांना उपयोगी तंत्रज्ञान विकसित होत आहे. ज्या देशातील नागरिकांना इंटरनेट जास्त उपलब्ध होईल त्या देशातील गरिबी वेगाने कमी होण्यास मदत होईल असे समजले जाते. हे नवे तंत्रज्ञान जागतिक असले तरी यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बऱ्याच देशांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर इंटरनेट आधारित सेवांमुळे अनेक देशांत भांडण सुरू झाले आहे. सध्या चीन आणि इतर देशांतील भांडण बरेच गाजत आहे.
आता आयओटी, एआय….
आता 5-जीमुळे इंटरनेटचा वेग वाढणार आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, ब्लॉकचैन आगामी काळातील तंत्रज्ञान असणार आहे. त्यामुळे भारतासह अनेक देश या क्षेत्रात आघाडी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
करोनाचा मुकाबला…
स्पॅनिश फ्ल्यूनंतर शंभर वर्षांनी करोनाव्हायरससारखा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जग हवालदिल झाले. मात्र, मोबाइल आणि इंटरनेटमुळे नागरिकांना या काळात आपले बरेच व्यवहार सहज पूर्ण करता आले. त्यामुळे 1919 मध्ये जगावर जेवढा परिणाम झाला होता त्यापेक्षा कितीतरी कमी परिणाम इंटरनेटमुळे आता करोना उद्भवल्यानंतर झाला आहे. या काळात इंटरनेटमुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करता आले. परस्परांच्या संपर्कात राहता आले. औषधोपचाराची माहिती घेता आली. त्यामुळे स्पॅनिश फ्ल्यूपेक्षा करोना व्हायरसमुळे जगाची हानी कितीतरी कमी झाली आहे.