नवी दिल्ली – इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती योग्य वाटल्यामुळे परकीय गुंतवणूक भारतीय भांडवल बाजारात वाढत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर आणि कर्जरोखे बाजारात 28 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
विविध देशांनी अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी 9 लाख कोटी डॉलरचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात भांडवल सुलभता आहे. त्यातच भारतातील बऱ्याच कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. लॉकडाऊनच्या काळातही चांगले ताळेबंद जाहीर केल्यामुळे आगामी काळात भारतीय कंपन्या अधिक परतावा देतील, असे परकीय गुंतवणूकदारांना वाटत असल्याची परिस्थिती आहे.
3 ते 14 ऑगस्टदरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 26,150 कोटी रुपयांची तर कर्जरोखे बाजारात 2,056 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. पाच महिन्यांनंतर या गुंतवणूकदारांची रोखे बाजारातील गुंतवणूक वाढली आहे.
भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्च पातळीवर आहे. त्यामुळे आगामी काळात मात्र गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता आहे. सरलेल्या आठवड्यात वाढलेल्या महागाईची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आगामी काळात रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी काळात विविध कंपन्यांच्या ताळेबंदच्या आधारावर गुंतवणूकदार निवडक खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.