ऑगस्ट महिन्यापासून 103 रुपयांची वाढ; डिसेंबरमध्ये 14 रुपयांनी गॅस महागला
पिंपरी – गेल्या चार महिन्यांपासून गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे उद्योनगरीसह मावळच्या ग्रामीण भागातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. डिसेंबर महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात गॅसचा दर 684 रुपयांवर पोहोचला आहे. परिणामी गृहिणींच्या दर महिन्यांच्या बजेटमध्ये वाढ होत आहे.
ऑगस्ट महिन्यापासून गॅसच्या दरामध्ये तब्बल 103 रुपयांची घसघसीत वाढ झाल्यामुळे शहरवासियांना महागाईची झळ बसू लागली आहे. उज्जवला योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अनुदानावर गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. मात्र दर महिन्याला सिलिंडरचे भाव वाढत असून डिसेंबर महिन्यामध्ये सिलिंडरने 684 चा आकडा पार केला आहे.
एवढा महागडा सिलिंडर खरेदी करताना उद्योगनगरीसह मावळ भागातील गृहीणींच्या बचतीला कात्री लागली आहे. उज्जवला योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात आपुलकी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र रोजच्या भाववाढीने त्याचे फलीत झाले नसल्याचे महिला सांगत आहेत. वाढत्या गॅस सिलिंडरच्या दरामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनताही मेटाकुटीस आली आहे.
ग्रामीण भागातील जनतेला सातशे रुपयांच्या आसपास पैसे देऊन गॅस सिलिंडर खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्या भागात पुन्हा चुली पेटविल्या जात आहेत. त्यामुळे चुलमुक्त करण्याच्या शासनाच्या धोरणावर पाणी फिरले आहे. ग्रामीण भागात घरामध्ये असलेले गॅस सिलिंडर केवळ शोभेची वस्तू बनली आहे.
शहरी भागातील महिलांना गॅसवर स्वंयपाक केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बचतीला कात्री देत महिलांना गॅस सिलिंडर खरेदी करावा लागत आहे. अनुदानाची रक्कम जास्त प्रमाणात जमा होत असल्याचे सांगितले जात असले तरी ती रक्कम अतिशय थोड्या प्रमाणात जमा होते. तसेच रक्कम जमा होण्यासाठी एका वर्षाला 12 गॅसची मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यानंतर सिलिंडर खरेदी केल्यास सबसिडीची रक्कम खात्यावर जमा होत नाही.
परिणामी गॅस सिलिंडर खरेदी करतेवेळी एवढे पैसे मोजावे लागत असल्यामुळे हातावर पोट असलेल्या चाकरमान्यांची चांगलीच गोची होते.
मावळात फक्त चहासाठीच गॅसचा वापर
उज्जवला योजनेच्या सुरूवातीला सिलिंडरची किंमत 550 रुपये होती. त्यावेळी ग्राणीण भागातील नागरिक काही प्रमाणात स्वंयपाक करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर करत होते. मात्र आता सिलिंडरचा भाव सातशे रुपयांपर्यंत पोहचल्यामुळे केवळ पाहुणा आल्यास चहा करण्यासाठीच गॅसचा वापर केला जात आहे.
गॅस दरवाढ झाल्याने महिन्याची काटकसर करताना खूप अडचणी येतात. दिवसेंदिवस सगळ्याच गोष्टी महाग होत आहेत. त्या तुलनेत उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे सामान्य माणसांने जगायच कसे हा प्रश्न आहे.
– राणी शिंगोटे, गृहिणी
गेल्या काही दिवसांमध्ये 500 रुपयांचा गॅस सिलिंडर 700 रुपयांच्या आसपास पोहचला आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबाना गॅस घेणे परवडत नाही. सरकारने दिलेली सबसिडीही थोड्या प्रमाणात जमा होत आहे. राज्य व केंद्र सरकारने मिळून गॅसची सुरु असलेली दरवाढ थांबवावी.
– नंदा आरोटे, गृहिणी