लहरी हवामानामुळे भाटघर परिसरातील बळीराजा हैराण
भाटघर – भाटघर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण आहे. तर हवामान खात्याने पावसाची शक्यताही वर्तवली आहे. दरम्यान, परिसरात भातकाढणी संपली असून भातभेळ्याची गंज शेतकऱ्यांनी शेतात रचली आहे; परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस झाल्यास गंज भिजण्याची शक्यता आहे, यामुळे जनावरांसाठी चारा कमी पडणार असल्याच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
अवकाळी पाऊस पुन्हा झाल्यास चाऱ्याचा जाणवणार तुटवडा
भाटघर परिसरात अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अत्यंत कमी भात उत्पादन झाले आहे. यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त आहे. डिसेंबर महिना उजाडला तरी पावसाचे वातावरण असल्याने सगळेच हैराण झाला आहे. तर यावर्षी वर्षभर पावसाचे वातावरण राहते की काय? अशी चर्चा झडत आहे. पुढील असेच वातावरण राहिल्यास त्याचा परिणाम कांदा, ज्वारी, हरभरा पिकांवर होणार आहे.