पुणे- मागील काही दिवसांत पुण्यात गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांत मोठी वाढ झाली आहे. महिला अत्याचाराच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. हा मुद्दा बुधवारी राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या काळात पुण्यातील लोकप्रतिनीधींनी उपस्थित केला.
खडकवासला मतदारसंघात अवैध व्यवसाय ; आमदार तापकीर
खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी अवैध धंद्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, वारजे भागातील ओल्डनेस्ट, गोकुळनगर पठार, अमृतवेल सोसायटी, रामनगर झोपडपट्टी, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, कर्वेनगर हद्द, धनकवडी भागातील सहकार पोलीस स्टेशन अंतर्गत मोहननगर, बालाजीनगर, अंबेगाव पठार, त्याचप्रमाणे धायरीत परिसरातील डीएसके रोड, अंबामाता मंदिर, खंडोबा मंदिर, पारी कंपनी चौक अशा विविध ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. ते बंद होतील का? असा प्रश्न तापकीर यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर “अवैध व्यवसाय बंद करण्यासंदर्भात सूचना देण्यात येतील,’ असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
गंभीर गुन्हे रोखण्याबाबत उपाय काय? : आमदार शिरोळे
भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “17 मार्चरोजी 12 वर्षीय मुलीला घरातून ओढून बलात्कार करण्यात आला. 18 मार्चला पाषाण टेकडीवर जोडप्याचे दमदाटीने मोबाइल ऍपद्वारे 72 हजार रुपये लुटले, दहा दिवसांपूर्वी येरवडा भागात 20 ते 30 गाड्यांची गुंडांनी तोडफोड केली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. बोपोडी पोलीस चौकीजवळ चार ते पाच जणांनी एका युवकाचा धारदार शस्त्राने खून कऱण्यात आला. तसेच दुकाने फोडली गेली. या सर्व गुन्ह्यांबाबत शासन काय कारवाई करणार असून अशा घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना असल्याचा सवाल आमदार शिरोळे यांनी उपस्थित केला.
हडपसरमध्ये बाल गुन्हेगार वाढले : आमदार तुपे
हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी बाल गुन्हेगारीकडे लक्ष वेधले. “एका शाळकरी मुलीवर चाकू हल्ला झाला. बाल गुन्हेगारीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी काय उपाययोजना आहेत. माझ्या मतदार संघात मंजूर असलेली काळे-बराटे आणि फुरसुंगी ही दोन्ही पोलीस स्टेशन कधी पूर्ण होतील, असा प्रश्न उपस्थित केला. शहरी भागांत महाविद्यालयातील मुले व्यसनाधीन होत आहेत. हे रोखण्यासाठी एसीपी नार्कोटिक्स, पीआय नार्कोटिक्स असे काही पद निर्माण होऊ शकते का,’ असेही तुपे म्हणाले.
सर्व समस्यांबाबत निर्णय घेणार : गृहमंत्री
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, “पुणे शहरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन समस्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. दोन पोलीस स्टेशन्ससाठी जागा उपलब्ध करून दिली, तर ती लगेच सुरू करण्यात येईल. शिवाय काही शहरांमध्ये अमली पदार्थविरोधी मोहीम राबविण्यासाठी आपण सूचना केल्या आहे. तशी मोहीम राज्यभर राबविण्यात येईल.’