मंचर – इस्रोची स्थापना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली आहे. आज काही लोक भारत बलशील झाला असे म्हणतात; परंतु कॉंग्रेसमुळेच भारत बलशाली झाला आहे याचे भान सत्ताधाऱ्यांना नाही, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
मंचर (ता. आंबेगाव) येथील लाला अर्बन बॅंकेला बुधवारी (दि. 23) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, भारताने पाठवलेले चांद्रयान चंद्राच्या भूमीवर यशस्वीरीत्या उतरले असून भारतीय वैज्ञानिकांना मी शुभेच्छा देतो. अतिशय उत्कृष्ट कामगिरी इस्रोच्या माध्यमातून झाली आहे; परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इस्रोची पायाभरणी केली आणि त्यानंतर इस्रोच्या माध्यमातून अनेक यशस्वी मोहिमा करण्यात आल्या.
पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांनी देशाला पुढे नेण्याचे काम केले. भारतीय तंत्रज्ञानाचा पाया राजीव गांधी यांनी घातला. जग मुठीत आणून ठेवले. म्हणून आपण आजचा दिवस पाहतो आहोत. आजचे सरकार हे फक्त आम्ही केले असं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. परंतु या सर्व गोष्टीची पायाभरणी ही कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकाळात झालेली आहे. आज भारत महासत्ता बनत आहे. ही महासत्ता कॉंग्रेसने केलेल्या कामामुळे झाली आहे.