मुंबई – संत परंपरेच्या महाराष्ट्रात कोणीच योगी नाही असे म्हणणे आणि महाराष्ट्रात अवघे सत्तेचे भोगी आहेत म्हणणे महाराष्ट्राचा अपमान नाही का? असा प्रश्न काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ट्विट करत विचारला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्देशानंतर मंदिर आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या भोंगे उतरवण्याच्या कारवाईनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आमच्या महाराष्ट्रात “योगी’ कुणीच नाहीत. आहेत ते फक्त सत्तेचे “भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.
यावर आता सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांच्या या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. ‘संत परंपरेच्या महाराष्ट्रात कोणीच योगी नाही आणि महाराष्ट्रात अवघे सत्तेचे भोगी आहेत असे म्हणणे महाराष्ट्राचा अपमान नाही का?’, असा सवाल सावंत यांनी केला आहे. तसेच स्वार्थापोटी धर्माचा वापर करणाऱ्यांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात अल्प असे ज्ञान। अंगीं ताठा अभिमान। तुका म्हणे अवघें सोंग। तेथें कैंचा पांडुरंग, असेही सावंत यांनी सांगितले आहे.
सचिन सावंत यांचे ट्विट
संत परंपरेच्या महाराष्ट्रात कोणीच योगी नाही असे म्हणणे आणि महाराष्ट्रात अवघे सत्तेचे भोगी आहेत म्हणणे महाराष्ट्राचा अपमान नाही का?
स्वार्थापोटी धर्माचा वापर करणाऱ्यांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात
अल्प असे ज्ञान। अंगीं ताठा अभिमान।।
तुका म्हणे अवघें सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।। pic.twitter.com/CDDokx2Kbg— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 28, 2022