विनोद मोहिते
इस्लामपूर – गेली महिनाभर इस्लामपूर शहरात करोनाचे तब्बल 26 रुग्ण आढळल्याने प्रचंड दहशत निर्माण झाली होती. नगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नाने व संयमी नागरिकांनी लॉक डाऊनला दिलेल्या प्रतिसादाने शहरात करोना रुग्णांची संख्या रोखण्यात यश आले आहे. गेल्या तीन दिवसांत तालुक्यातील कामेरी व कासेगाव येथे करोनाचे रुग्ण आढळल्याने आता ग्रामीण भाग धास्तावला आहे. करोनाच्या निमित्ताने झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करत स्वयंशिस्त पाळली आहे. करोना मुक्तीचा इस्लामपूर पॅटर्न यानिमित्ताने राज्यात चर्चेत आला आहे.
इस्लामपूर हे वाळवा तालुक्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या या शहराने महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या करोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूरने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. एका शहरात करोनाचे 26 रुग्ण आढळले आहेत. सुदैवाने हे एकाच कुटुंबाशी संबंधित असल्याने अद्याप म्हणावा तसा धोका वाढलेला नाही. ते आता उपचारादरम्यान बरे होऊन घरी परतले आहेत. परंतु, अद्यापही शहरात धाकधूक कायम आहे.
दि. 22 मार्चला केंद्र सरकारने पुकारलेल्या एक दिवसाच्या जनता कर्फ्युला शहरात चांगला प्रतिसाद दिला होता. त्याच दिवशी सायंकाळी इस्लामपुरात करोनाबधित रुग्ण आढळले. एकदम चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरात प्रचंड दहशद निर्माण झाली होती. प्रशासनाने तातडीने ते रुग्ण राहत असलेला परिसरात सील केला होता. त्यांनतर चार दिवसांत चार करोना रुग्णांचा आकडा वाढत 26 वर पोहचला.
तब्बल महिनाभर शहरात करोनाची दहशत आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन पुकारला असलातरी शहरात सुरवातीला रुग्ण सापडल्यावर तातडीने तीन दिवस पूर्णतः शहर बंद केले होते. त्याचं पध्दतीने रेठरेधरण येथील वृद्ध रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तेंव्हा आणि निगडी येथील युवती पॉझिटिव्ह झाल्यामुळे सध्या इस्लामपूर शहरात सलग तीन दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. विशेषतः त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी निगडी येथील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरात पूर्णतः लॉकडाऊनची ही तिसरी वेळ आहे.
करोनाच्या संसर्गाने कोणालाही सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत याचा परिणाम जाणवू लागला आहे. इस्लामपूर येथील औद्योगिक वसाहतीमधील 1500 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे औद्योगिक वासाहतीमधील कामगारांच्यावर आधीच ओढातान त्यात काम बंद त्यामुळे आर्थिक संकट येणार आहे. औद्योगिक वसाहतीत चांगली उलाढाल असलेले उद्योग कामगारांना सांभाळतील पण मध्यम आणि लघु उद्योजकांचे काय होणार? हा मोठा प्रश्न आहे. या संकटाने औद्योगिक वसाहती मधील कामगार आणि मालक यांच्या बरोबरीनेच त्यावर आधारीत छोटे उद्योग हे सर्वजण अडचणीत आले आहेत.
शहरात वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे व्यावसायिक पूर्णतः अडचणीत आले आहेत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, फिरते विक्री करणारे, हातगाडीवाले अडचणीत आहेत. काही जणांना शिवभोजन थाळी आधार ठरत आहे. उपासमार रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तर्फे सुरू असणारा माणुसकीची थाळी उपक्रम उपयुक्त ठरला आहे. येथे दररोज सकाळी शहरातील नऊ ठिकाणी तब्बल दोन हजार नागरिक पोटाची भूक भागवत आहेत. शहरातील गरीब गरजूंना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे सह विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले आहे.
शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्यानी एकत्रित येऊन माणुसकीचं नातं हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या वतीने शहरातील गरजूंना जेवण, जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत. पोलीस अधिकारी, कर्मचारी, उद्योजक, वकील, इंजिनियर, पत्रकार यांचा उपक्रमात क्रियाशील सहभाग आहे. शहरात विविध भागात स्वच्छता राबवणे, निर्जंतुक करणे यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी, यांचेसह आरोग्य, अग्निशमन दलाचे कर्मचारी रात्रंदिवस व्यस्त आहेत. शहरातील नागरिकांना सेवा सुविधा निर्माण करून देणे, कंटेंटमेंट झोन मध्ये जीवनावश्यक सेवा देताना दक्षता घेतली जात आहे.
आरोग्य अधिकारी परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा सर्व्हे करत आहेत. शहरातील रस्ते बंद केले गेले आहेत. शहरात प्रवेश करताना पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अत्यावश्यक वाहनाशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. दुचाकीवरून विनाकारण फिरणे, मास्क न वापरणे, मॉर्निंग वॉक, पोहायला जाणे, याबाबत तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत अडकवले गेले आहे.यामुळे आतां लॉक डाऊन काळात नागरिक स्वयंशिस्त पाळताना दिसत आहेत.
ग्रामीण भाग झालाय दक्ष..!
प्रथमच करोनाचे रुग्ण शहरात आढळल्याने इस्लामपूरातील रस्ते बंद केले आहेत. जीवनावश्यक वस्तू घरपोच होत आहेत. कामेरी आणि कासेगाव येथे करोनाचा शिरकाव झाल्याने तालुक्यातील गावांनी आपली गावं सुरक्षित करण्यासाठी पावले उचलली आहेत. गावचे रस्ते बंद केले आहेत. तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग असल्याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त आहे. नव्याने पुणे, मुंबई तून कोणीही गावांत येवू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.