नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरीमधील घटना आणीबाणीपेक्षाही भयंकर असल्याची टीका करीत शिवसेना नेते संजय राउत यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर निशाणा साधला.
कॉग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राज्यसभेतील शिवसेनेचे नेते संजय राउत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. यूपी सरकारने लखीमपूरमधील पिडीतांच्या चौकशीसाठी गेलेल्या कॉग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईची राउत यांनी कडक शब्दात निंदा केली.
राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात वीस मिनिटे चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये लखीमपूरसह देशभरात पसरलेल्या हुकुमशाही वातावरणावर चर्चा झाली. राउत म्हणाले की, लखीमपूरच्या घटनेनंतर या देशात लोकशाही उरली आहे का? लोकशाही भ्रष्ट झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजप नेहमी आणीबाणीचा मुद्या उकरून काढत असते. परंतु, लखीमपूरची घटना आणीबाणी पेक्षाही भयानक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्ताने माखला आहे, असा टोला राउत यांनी यावेळी मारला.
शेतकरी आंदोलन करताना लखीमपूरची दुर्घटना ही शेतकरी, मजूर यांच्यासाठी लांच्छनास्पद आहे. हा एका राज्याचा विषय नाही, अन्यायासाठी लढणाऱ्यांसोबत असे केले जात असेल तर जगासाठी हे धोकादायक संकेत आहेत. ही भारत पाकिस्तान लढाई आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
लखीमपूरसारखी घटना महाराष्ट्र, केरळ किंवा राजस्थान अशा भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये घडली असती तर भाजप रस्त्यावर उतरला असता. परंतु, आज शेतकऱ्यांचे सांत्वन करायला सुध्दा कुणाला जावू दिले जात नाही आहे, अशी खंत राउत यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस सोबत मतभेद असू शकतात, पण इंदिरा गांधी यांच्या नातीला अशी वागणूक दिली जात आहे, हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.