मुंबई – निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांना हटविण्यात आले होते. मात्र, आता इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून बदली झालेले पी. वेलारासू यांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर ही नियुक्ती करण्यात आल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी इक्बाल सिंह चहल यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवले होते.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एका पदावर, जिल्ह्यात किंवा मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिले होते.
या आदेशानुसार इक्बालसिंह चहल, अश्विनी भिडे आणि पी.वेलारासू यांची बदली करणे बंधनकारक झाले. इक्बाल सिंह चहल यांना अपवादात्मक स्थितीत मुंबई पालिका आयुक्तपदावर कायम ठेवण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. ती मागणी आयोगाने फेटाळली होती.