आयपीएल स्पर्धेत यंदाच्या मोसमापासून संघांची संख्या वाढून दहा झाली. त्यात गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स या दोन नव्या संघांनी पहिलीच स्पर्धा खेळताना आपल्या गुणवत्तेची साक्ष दिली. या दोन संघांनी पहिल्या सामन्यापासूनच बलाढ्य संघांवर दडपण राखत थेट प्लेऑफ गटात प्रवेश केला व समीक्षकांनाही आश्चर्याचा धक्का दिला.
आता यंदाच्या मोसमातील साखळी फेरी संपली असून बेंगळुरू व राजस्थान यांच्यासह याच दोन नव्या संघांनी बाद फेरी गाठली आहे. गुजरात व लखनौ या संघांचे नेतृत्व अनुक्रमे हार्दीक पंड्या व लोकेश राहुल यांच्याकडे आहे. पंड्या या स्पर्धेत पहिल्यांदाच एखाद्या संघाचे पूर्ण वेळ नेतृत्व करत आहे तर राहुलला नेतृत्वाचा चांगलाच अनुभव आहे. पंड्या या मोसमापूर्वी मुंबई इंडियन्सकडे होता. मात्र, यंदाच्या वर्षाच्या प्रारंभी वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याला दुखापत झाली. त्यानंतर तो संघाबाहेर गेला व नंतर दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरताना त्याने आयपीएल स्पर्धेतही सातत्यपूर्ण कामगिरी केली.
दुसरीकडे राहुलने गेल्या वर्षी पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते. मात्र, सरस कामगिरी केल्यानंतरही त्यांना बाद फेरी गाठता आली नव्हती. त्यानंतर त्याचे संघ व्यवस्थापनाशी फारसे पटले नाही व त्याने स्वतःला मुक्त करण्याची पंजाब संघ मालकांना विनंती केली. त्यानुसार तो मुक्त झाला व यंदाच्या स्पर्धेपूर्वीच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच त्याला लखनौ संघाचे कर्णधारपद दिले गेले.
या दोन्ही संघांनी यंदाच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज या स्पर्धेतील दादा समजल्या जात असलेल्या संघांची मक्तेदारी संपुष्टात आणली. इतकेच नव्हे तर हे दोन संघ स्पर्धेत पदार्पण करत आहेत, असे त्यांच्या कामगिरीवरून कुठेही जाणवले नाही. केवळ नेतृत्वातील यशापयशाची बेरीज किंवा वजाबाकी केली तर पंड्याची कामगिरी राहुलपेक्षा सरस दिसते. एकतर राहुलला क्वांटन डीकॉक व दीपक हुडा यांच्या कामगिरीवर जास्त अवलंबून राहावे लागले व जेव्हा ते अपयशी ठरले तेव्हा त्यांना पराभवाची नामुष्कीही स्वीकारावी लागली.
गुजरातने शुभमन गिल, डेव्हीड मिलर, राहुल तेवतिया व रशिद खान यांच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवले मात्र, जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा मोक्याच्या क्षणी पंड्याने कर्णधार म्हणून आपले कौशल्यही सिद्ध केलेच मात्र, एक फलंदाज किंवा गोलंदाज म्हणूनही त्याने यश मिळवले. त्यामुळे साखळीत दादा ठरलेले हे दोन नवे संघ प्लेऑफमध्येही वर्चस्व राखणार का हेच पाहणे रंजक ठरणार आहे.