मुंबई – सलामीवीर पृथ्वी शॉ याच्या वादळी अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार ऋषभ पंत व सर्फराज खान यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या गुरुवारी झालेल्या आयपीएल स्पर्धेतील लढतीत विजयासाठी 150 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत दिल्लीला पहिल्यांदा फलंदाजी दिली. शॉ याने डेव्हीड वॉर्नरसह डावाची सुरुवात केली. वॉर्नरला झाकून शॉ याने वादळी फलंदाजी केली. या जोडीने 67 धावांची सलामी दिली, त्यात वॉर्नरचा वाटा केवळ 4 धावांचा होता. शॉ याने दमदार अर्धशतकी खेळी केली व पाया रचला मात्र, त्याचा लाभ दिल्लीला घेता आला नाही.
शॉ देखील 34 चेंडूत 9 चौकार व 2 षटकार फटकावताना 61 धावा करुन बाद झाला. लगेचच रोवमन पॉवेलही परतला. त्यानंतर मात्र, पंत व सर्फराजने डाव सावरत संघाला 20 षटकांत 3 बाद 149 अशी समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. पंतने 36 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार यांच्या मदतीने नाबाद 39 धावा केल्या. तर सर्फराजने नाबाद 36 धावांची खेळी करताना 28 चेंडूत 3 चौकार फटकावले. लखनौकडून लेग स्पीन गोलंदाज रवी बिष्णोईने 2 गडी बाद केले. कृष्णाप्पा गौतमने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक – दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 3 बाद 149 धावा. (पृथ्वी शॉ 61, ऋषभ पंत नाबाद 39, सर्फराज खान नाबाद 36, रवी बिष्णोई 2-22, कृष्णाप्पा गौतम 1-23).