मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआयला विंडो मिळाली असून, आता येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत हे सामने अमिरातीत खेळवले जाणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
हे उर्वरित 31 सामने येत्या 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान होतील. गेल्या वर्षी करोनामुळे लांबणीवर पडलेली आयपीएल अमिरातीतच खेळवली गेली होती. त्यामुळे बीसीसीआयने पुन्हा याच ठिकाणी आयपीएल करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे यंदाची स्पर्धा मध्यावर स्थगित केली गेली होती. या स्पर्धेतील एकूण 60 पैकी 31 सामने अद्याप बाकी आहेत. बीसीसीआयने येत्या 29 मे रोजी बोलावलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय जाहीर केला जाणार आहे.
इंग्लंड आणि भारत यांच्यात 4 ऑगस्टपासून कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये 9 दिवसांची विश्रांती असून, हा काळ काही दिवसांनी कमी केला तर आयपीएलला विंडो मिळणार आहे. त्याचसाठी सध्या बीसीसीआयची इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाशी सातत्याने बोलणी सुरू आहेत.
अमिरातीत सामने घेणे खर्चाच्या दृष्टीनेही लाभदायक ठरणार आहे. इंग्लंडच्या तुलनेत अमिरातीत हॉटेल, स्टेडियम इत्यादीचा खर्च कमी आहे. तसेच संघाला प्रवास करणेही सोपे ठरेल. तसेच अमिरातीतील सप्टेंबरमध्ये असणारे वातावरणही स्पर्धेसाठी पूरक आहे.