आबुधाबी –मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज होत असलेला सामना कोलकाता संघासाठी महत्त्वाचा आहे. मुंबईने क्रमवारीत अग्रस्थान मिळवले आहे. मात्र, कोलकातासाठी ही लढत स्पर्धेत टीकून राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे.
कर्णधार रोहित शर्माने या स्पर्धेत संमिश्र यश मिळवले असले तरीही इशान किशन, कॅरन पोलार्ड, हार्दिक पंड्या यांनी डेथ ओव्हर्समध्ये सातत्याने सरस कामगिरी केली आहे. मोठ्या घावसंख्येचा पाठलाग करताना त्यांनी आपले वर्चस्व राखले आहे. तसेच प्रथम फलंदाजी असताना अखेरच्या पाच षटकांत त्यांनी अन्य संघांपेक्षाही जास्त धावगती राखली आहे.
यंदाच्या स्पर्धेत त्यांच्या विजयाची टक्केवारीही 50 पेक्षा जास्त आहे. चेन्नई सुपर किंग्जशी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी कामगिरीत सुधारणा केली असून आज अन्य कोणत्याही संघापेक्षा त्यांची फलंदाजी सर्वात बलाढ्य मानली जात आहे.
सूर्यकुमार यादव व कॉन्टन डीकॉक देखील भरात आल्याने त्यांना मधल्या फळीत दमदार फलंदाजांची फौज मिळाली आहे. सलामीला येत धावांचा वेग वाढवण्याचे काम डीकॉकने केले असले तरी तो मधल्या फळीतही सरस कामगिरी करू शकतो. त्यामुळे या सामन्यात रोहित नव्या खेळाडूसह डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.
त्या मानाने कोलकाता संघाला मधल्या फळीत येत असलेले अपयश सतावत आहे. इयान मॉर्गन, सिद्धेश लाड, शुभमन गिल, आंद्रे रसेल, सुनील नरेन यांच्यासह कर्णधार दीनेश कार्तिकनेही विविध सामन्यांत चांगली फलंदाजी केली आहे. मात्र, त्यात सातत्य नसल्याने त्यांना अनेकदा हातात असलेलेही सामने गमवावे लागले आहेत. आज ते मुंबईच्या गोलंदाजांचा त्यातही जसप्रीत बुमराहचा सामना कसा करतात यावर त्यांचे यश अवलंबून राहणार आहे. दरम्यान, स्पर्धेत दिनेश कार्तिकऐवजी इयान मॉर्गनकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या गोलंदाजांनी आपल्या दर्जानुसार अद्याप कामगिरी केलेली नाही. यंदाच्या स्पर्धेत सर्वात जास्त रकमेचा करार असलेला पॅट कमिन्सही आपला प्रभाव पाडू शकलेला नाही. त्याच्या जागी आजच्या सामन्यात लॉकी फर्ग्युसन याला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही काही सामन्यांतून वगळण्यात आले होते. येथील खेळपट्ट्या फलंदाजीला पोषक असल्याने कुलदीप महागडा गोलंदाज ठरू शकतो, त्यामुळेच त्याला वगळण्यात आल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले होते. तरीही आजच्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला आखातात फारसे यश मिळालेले नाही. यंदाच्या स्पर्धेतही त्याने काही वेळा सरस खेळ केला असला तरीही त्यात रोहित टच दिसून आलेला नाही. यातून तो बाहेर येण्यात यशस्वी ठरला तर मुंबईला आणखी दिलासा मिळणार आहे.
पोलार्ड, पंड्या निर्णायक
कोलकाताला अखेरच्या पाच षटकांत कॅरन पोलार्ड व हार्दिक पंड्या यांच्यावर दडपण राखण्यासाठी योजना तयार करावी लागणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणीही करावी लागणार आहे. या दोघांना लवकर बाद करण्यात यश आले तरच कोलकाताला विजयाची संधी राहणार आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह यानेच मुख्य भार वाहिला आहे. त्याने आजवर झालेल्या प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धी फलंदाजांवर नियंत्रण मिळवले आहे. त्याच्याकडून याही सामन्यात मुंबईला मोठ्या अपेक्षा राहणार आहेत.