दुबई – रॉबीन उथप्पा व केन विल्यमसन यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांना तर एकेक धावा घेणे देखील कठीण होत आहे, अशा शब्दात माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने टीका केली आहे.
यंदाच्या स्पर्धेत ज्यांना करोडो रुपयांची बोली लावून खरेदी केले गेले त्यांनाच जर अपयश येत असेल तर त्यांच्या संघांना पराभवच पत्करावे लागतील. राजस्थान रॉयल्स संघाबाबत बोलायचे झाले तर उथप्पा व विल्यमसन यांना सातत्याने अपयश येत आहे. मग त्यांची कामगिरी कधी सिद्ध होणार व त्यांच्या संघाला त्याचा कधी लाभ होणार. सराव सत्रात या दोघांनीच नव्हे तर यंदाच्या स्पर्धेत अद्याप ज्यांच्याकडून सरस कामगिरी झाली नाही त्यांनी आपापल्या प्रशिक्षकांशी तसेच संघातील वरिष्ठ खेळाडूंशी सातत्याने चर्चा करणे गरजेचे आहे. मार्गदर्शन घेतले तरच आपल्या चुका दूर होतात व आपली कामगिरी कशी चांगली होइल याचा विचार खेळाडू करायला सुरुवात करतात, असेही गंभीर म्हणाला.
उथप्पाकडे गुणवत्ता आहे. मी त्याचा खेळ खूप जवळून पाहिला आहे. यंदाच्या स्पर्धेत मात्र, त्याला अपयशाचाच सामना करावा लागत आहे. त्याला चार सामन्यांतून केवळ 33 धावाच करता आल्या आहेत. त्याला राजस्थान संघाने तब्बल 3 कोटी रुपयांना खरेदी केले होते. मग आता त्याच्या या सुमार खेळामुळे राजस्थानलाच फटका बसलेला आहे. त्यानेही याचा विचार केला पाहिजे. नेटमध्ये सराव करताना आपले फुटवर्क, हेड पोझीशन, चेंडूच्या टप्प्यापर्यंत आपले पाय येत आहेत का नाही हे पाहिले पाहिजे तरच त्यात सुधारणा होईल, असेही गंभीर म्हणाला.
विल्यमसनबाबतही तेच होत आहे. त्यानेही चार सामन्यांतून फारशी चमक दाखवलेली नाही. जागतिक क्रिकेटमधील एक चांगला फलंदाज असूनही त्याला या स्पर्धेत आद्याप सूर गवसलेला नाही. त्यानेही कर्णधारासह मेंटॉरशी चर्चा केली पाहिजे. येत्या काळात त्याची कामगिरी सरस झाली नाही तर त्याला संघातील स्थानही गमवावे लागेल, असेही गंभीरने सांगितले.