संघमालकांची बीसीसीआयकडे मागणी
मुंबई – आयपीएल स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत अमिरातीत होत आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू, सपोर्ट स्टाफ व अन्य तांत्रिक अधिकारी यांना आपली पत्नी तसेच कुटुंबीय यांच्यासमवेत अमिरातीत जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी सर्व संघमालकांनी बीसीसीआयकडे केली आहे.
मार्चमध्ये होणारी ही स्पर्धा करोनामुळे लांबणीवर टाकली गेली होती. आता अमिरातीत हा धोका अत्यंत कमी असल्याने तेथे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. जवळपास दोन महिने खेळाडू व काही व्यक्ती अमिरातीत असतील. करोनाच्या धोक्यामुळे खेळाडूंच्या सामन्याव्यतिरिक्त फिरण्यावर बंधने असणार आहेत. ज्या दिवशी सामने नसतील त्या दिवशी हॉटेलवरच त्यांना थांबावे लागेल मग अशा स्थितीत त्यांचे कुटुंबीय त्यांच्या समवेत असतील तर त्यांच्यासाठी चांगले ठरेल, अशा शब्दांत संघमालकांनी बीसीसीआयकडे मागणी केली आहे.
ही स्पर्धा अमिरातीत आयोजित करण्यासाठी बीसीसीआयला प्रचंड खर्च येणार आहे. त्यातच दोन महिने या सर्वांची व्यवस्था करणे तसेच आता त्यांच्या कुटुंबीयांचीही व्यवस्था करणे खर्चिक होणार असून त्यामुळे बीसीसीआय या मागणीबाबत काय निर्णय घेते याकडे संघ मालक व खेळाडूंचे लक्ष लागले आहे.