बीसीसीआयच्या सूत्राने दिले संकेत…
पुणे – आयपीएल आयोजित करण्यासाठी सुरू असलेला अट्टहास अद्याप संपलेला नसून भारतात किंवा अन्य कोणत्याही देशात जर करोनाचा धोका तसेच अन्य नैसर्गिक आपत्तींचे संकट नसेल तर तिथे ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंडळाच्या सूत्राने दिली आहे.
करोनाचा धोका वाढल्याने देशात लॉकडाऊन करण्यात आले. हवाई प्रवासावर बंदी लावली गेली. त्याचबरोबर सीमाबंदीही जाहीर केल्याने क्रीडा स्पर्धाच नव्हे तर सर्व जनजीवनच विस्कळीत झाले. अन्य स्पर्धांच्या बरोबरीने आयपीएल देखील स्थगित करावी लागली. आता ही स्पर्धा कधी व कुठे खेळविण्यात येणार याबाबत सध्यातरी काहीही स्पष्ट झालेले नसले तरी या स्पर्धेच्या आयोजनाचा मंडळाचा अट्टहास कमी झालेला नाही.
श्रीलंका, अमिराती व वेस्ट इंडिज या देशांनी बीसीसीआयला आमच्या देशात आयपीएल स्पर्धा आयोजित करा, असा प्रस्ताव दिला होता. येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा होणार का रद्दच केली जाणार याबाबतचा संभ्रम कायम असल्याने मंडळाच्या आशा वाढल्या आहेत. ही स्पर्धा रद्द झाली किंवा पुढे ढकलली गेली तर मिळालेल्या विंडोत आयपीएल स्पर्धा होऊ शकते, असेही मंडळाचे मत आहे.
मात्र, त्यासाठी भारतात किंवा अन्य कोणत्याही देशात स्पर्धेसाठी अनुकुल वातावरण मिळाले तर यंदाची आयपीएल आयोजित केली जाईल. ही स्पर्धा रद्द झाली तर मंडळाला जवळपास 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत आयोजित करण्यासाठी मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही या सूत्राने सांगितले.