थेंब-थेंब पाऊस पडत असताना जोरदार सरी कोसळतील या भीतीनं घरात बसावं आणि रस्त्यात गुडघाभर पाणी साठेपर्यंत पाऊस पडत असताना बाहेर पडायला लागावं, अशी लॉकडाऊनची स्थिती झालीय. रुग्णांच्या वाढीचा वेग वाढला, एका दिवसात सापडलेल्या रुग्णांच्या संख्येनं इटलीला मागे टाकलं आणि त्याच दिवसापासून दुकानं उघडण्याची परवानगी मिळाली. त्यात सम-विषम वगैरे प्रकार का केले आणि ते फायद्याचे आहेत की अडचणीचे, हेच कळेनासं झालंय. खरंतर दुकानांमध्ये गर्दी होऊ द्यायची नसेल, तर ती विभागली जाणं गरजेचं आहे.
पार्किंगप्रमाणं रोज एकाच बाजूची दुकानं उघडी ठेवल्यामुळे त्या-त्या दिवशी त्या-त्या बाजूला गर्दी वाढेल आणि रस्त्याचा दुसरा भाग कर्फ्यू लागल्यासारखा बंद राहील. बाजार ही अशी गोष्ट आहे, जो एकदा भरला की सोशल डिस्टन्सिंग वगैरे शब्दही कुणाला आठवत नाहीत. आपल्या उपयोगाच्या वस्तू कुठे मिळतायत आणि त्या संपण्यापूर्वी कशा हस्तगत करायच्या, या एकमेव विचारात इंच-इंच लढवणाऱ्यांना एकमेकांत दोन मीटरचं अंतर राखायला कुठून सुचणार? पण आपल्याकडे निर्णय घेताना खूप विचार करतात, हे निश्चित! पूर्वीही कडकडीत लॉकडाऊन सुरू असताना दिवसातून दोन तास दुकानं उघडायला परवानगी दिली होती. म्हणजे, जी काही गर्दी व्हायचीय ती त्या दोन तासांत होऊन जाऊदे! ती नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेची सोय बघितली म्हणजे झालं!
31 आणि 1 या सलग येणाऱ्या विषम तारखांना दुकानदारांनी काय करायचं, ही विवंचना जूनमध्ये तीसच दिवस असल्यामुळे तूर्तास मिटली. तेवढ्यात आणखी एक चातुर्यानं बनवलेली नियमावली आमच्या हाती लागली. चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण सुरू करायला “नियमांच्या अधीन राहून’ परवानगी दिली गेलीय. नाकातोंडावर मास्क कम्पल्सरी असल्यामुळे मुद्राभिनयाचा निकाल लागल्यात जमा! शिवाय वाचिक अभिनयालाही मर्यादा येणारच. डबिंग केलं नाही तर गुदमरल्यासारखे “हवाबंद’ संवाद ऐकावे लागणार. सॅनिटायझर वगैरे खिशात ठेवता येईल; पण नायक-नायिकेनं डिस्टन्सिंग राखून केलेलं प्रेम एकविसाव्या शतकातल्या विसाव्या वर्षात पाहणं प्रेक्षकांना थोडं जड जाणार! आपल्याकडे तारे-तारकांची पोरंही “बाय डिफॉल्ट’ पडद्यावर येतात. त्यांच्या घरात सुना येतात त्याही रुपेरी पडद्यावरच्याच.
पाहता-पाहता घरातल्या घरात एक संपूर्ण टीम उभी राहते. हे वास्तव नियम करणाऱ्यांनी अचूक हेरलंय. सोशल डिस्टन्सिंग राखायचं नसेल तर कलावंत एकाच घरातले पाहिजेत, असा नियम केलाय. इतरांना तो अजब वगैरे वाटला तरी त्यातली मुत्सद्देगिरी आम्ही ओळखलीय. काही काळासाठी का होईना, औद्योगिक घराण्यांप्रमाणं कलावंत घराणी “टॉप’ला जाणार हे नक्की! बॉलिवूडमधली रखडलेली लग्नं यानिमित्तानं झटपट उरकलेली बरी! झगमगाट नसेल; पण खर्चही वाचेल.
एवढी सव्यं-अपसव्यं करून चित्रपट पूर्ण केला तरी बघणार कोण आणि कुठे? असा प्रश्न काहीजण उपस्थित करतायत. पण नियम करणारे तयारीचे असतात. हल्ली चित्रीकरणापेक्षा “पोस्ट प्रॉडक्शन’ आणि “प्रमोशन’ याच अधिक वेळखाऊ गोष्टी आहेत, हे ते जाणतात. करोनाची एक्झिट आणि चित्रपटाची एन्ट्री एकदम व्हावी आणि तोपर्यंत वेळ वाया जाऊ नये, अशी योजना आहे. मालिका म्हणजे तर भाजीपालावर्गीय पिकं. तोडली की बाजारात! सो… रोल कॅमेरा अँड… ऍक्शन!
– हिमांशू