नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धा दिवसेंदिवस जास्त यशस्वी होत आहे. केवळ भारतीय संघालाच नव्हे तर जगभरातील सर्व देशांच्या क्रिकेट संघांना नवोदित खेळाडूंचा सेकंड बेंच मिळत असून, त्यामुळेच ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख प्रशिक्षक रिकी पॉंटिंग याने व्यक्त केले.
आयपीएल स्पर्धेतून नवी गुणवत्ता मिळणार का, असे प्रश्न सातत्याने विचारले जात होते. पण आज जागतिक क्रिकेटमधील अनेक देशांचे संघ पाहिले तर त्यात आयपीएल स्पर्धेत गुणवत्ता सिद्ध करणारे खेळाडूच मोठ्या संख्येने दिसतात हेच या स्पर्धेचे यश म्हणावे लागेल. ऑस्ट्रेलियाच्या संघास मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी जे स्टार खेळाडू गवसले ते आयपीएलमधूनच आले आहेत. त्यामुळे यंदाची स्पर्धाही अशीच यशस्वी ठरेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.