पेटीएम, बायजू, ड्रीम-11 यांचाही करार मोडण्याची शक्यता
नवी दिल्ली – व्हिवोशी असलेला करार मोडल्यानंतरही आयपीएल होऊ शकते, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले होते. मात्र, आता व्हिवोच नाही तर पेटीएम, बायजू व ड्रीम-11 या कंपन्यांही चीनशी संबंधित असल्याने त्यांच्याशी असलेले सहप्रायोजकतेचे करारही मोडा असा दबाव येत आहे.
लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव तसेच करोनाच्या प्रसारासाठी जबाबदार असल्याने चीनविरोधात देशात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच बायकॉट चायना मोहिमेलाही प्रचंड प्रतिसाद मिळत असताना देशभावनेचा आदर राखत बीसीसीआयने मुख्य प्रायोजक असलेल्या व्हिवो या चीनच्या कंपनीशी असलेला करार संपूष्टात आणला होता. त्याबाबत देशवासीयांनी बीसीसीआयचे अभिनंदनही केले होते. मात्र, आता सहप्रायोजक असलेल्या या तीनही कंपन्या चीनशीच संबंधित असल्याने पुन्हा एकदा बीसीसीआयवर त्यांचे करार मोडण्यासाठी दबाव येत आहे. मुख्य प्रायोजक शोधण्यात अद्याप बीसीसीआयला यश आलेले नसताना या सप्रायोजकांशी असलेला करारही मोडला तर मग संपूर्ण आयपीएल स्पर्धाच संकटात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता बीसीसीआय काय भूमिका घेते यावरच आयपीएलचे भवितव्य अवलंबून राहिले आहे.
तसेच या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या काही संघांचाही चीनी कंपन्यांनी करार आहे तो देखील संकटात सापडू शकतो. ड्रीम-11 कंपनीत चीनच्या कंपनीची जवळपास 30 टक्के भागीदारी आहे. जर्सीसाठी प्रायोजक असलेल्या बायजूमध्येही चिनी कंपनीचा हिस्सा आहे तर, पेटीएममध्येही चीनच्याच कंपन्यांचा वाटा असल्याने आता याबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार यावरच आयपीएलचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
प्राधान्य कशाला : आयपीएल की देशांतर्गत स्पर्धांना
अमिरातीत आयपीएल होत असून त्याच सुमारास भारतात देशांतर्गत स्पर्धांनाही प्रारंभ होणार आहे. मात्र, आता आयपीएलमुळे देशांतर्गत स्पर्धांतील काही सामन्यांना भारतीय खेळाडूंना मुकावे लागणार आहे. यंदा बीसीसीआय मुश्ताक अली टी-20 स्पर्धा व रणजी करंडक स्पर्धाच खेळविणार आहे. या दोन्ही स्पर्धांतील कामगिरी राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी ग्राह्य ठरली जाते. त्यामुळे आता खेळाडूंच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. विजय हजारे करंडक, दुलीप करंडक किंवा चॅलेंजर सिरीज व इराणी ट्रॉफी या स्पर्धा रद्द होणार आहेत. आयपीएल खेळून अमिरातीतून भारतात परतल्यानंतर खेळाडूंना पुन्हा 14 दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे.