नवी दिल्ली – स्मार्टफोन आता आधुनिक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. यामुळे अनेक सोयी सुविधा मिळत असल्या तरी याचा पालक आणि मुलाच्या संबंधावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे.
विवो मोबाईल निर्माता कंपनीने सायबर मीडिया रिसर्च कंपनीच्या सहकार्याने पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांमध्ये नागरिकांशी चर्चा करून हा अहवाल तयार केला आहे. यावेळी 74 टक्के पालकांनी सांगितले की, यामुळे आमच्या आणि मुलाच्या नातेसंबधावर परिणाम झाला आहे.
मुलांच्या सोबत असतानाही त्यांच्या बोलण्या-चालवण्याकडे आमचे लक्ष नसते असे 75 टक्के पालकांनी सांगितले. आम्ही फोनवर बोलत असताना आमच्या बाजूला मुले आहेत किंवा नाहीत याचा विसर पडतो असे 69% पालकांनी सांगितले. मोबाईल पाहत असताना मुलांनी काही मागितल्यास किंवा विचारणा केल्यास चिडचिड होते असे 74% पालकांनी सांगितले.
कररोनाच्या पूर्वी दरडोई स्मार्टफोनचा वापर दररोज 4 तास 94 मिनिट होता. तो आता 32 टक्क्यांनी वाढून 6 तास 50 मिनिटे इतका झाला आहे. 94 टक्के नागरिकांनी सांगितले की, स्मार्टफोन आता आमच्या शरीरातच भाग झाला आहे. 70 टक्के नागरिक जेवताना मोबाईलचा फोन वापरतात. 72 टक्के नागरिक आपल्या कुटुंबासोबत असताना मोबाइल पाहतात तर 80 टक्के नागरिकांनी सांगितले की ते मुलासोबत असतांना मोबाईल चालवतात. लॉक डाऊनमुळे कुटुंबासोबत असण्याचे प्रमाण वाढले असले तरी मोबाइलमुळे या साहचर्याचा दर्जा खालावला आहे.
मोबाईल फोनचा वापर जास्त करू नये असे बऱ्याच पालकांना वाटते. मात्र त्याची अंमलबजावणी त्यांच्याकडून होऊ शकत नाही. विवो कंपनीचे संचालक योगेन्द्र श्रीरूमला यांनी सांगितले की, नागरिकांनी फोनचा वापर अत्यावश्यक कामासाठी केला पाहिजे. मात्र त्यामुळे आपल्या कुटुंबावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याकरिता या अभ्यास अहवालाचा वापर होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.