नवी दिल्ली – येत्या ऑगस्ट महिन्यापूर्वी भारतात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिली. देशाने 25 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. ते म्हणाले की, ही विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास आम्ही उत्सुक असून येत्या ऑगस्ट किंवा जास्तीत जास्त सप्टेंबरपर्यंत आम्ही काही प्रमाणात तरी ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
फेसबुकवरून संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्याच्या आधी ही विमानसेवा का सुरू करता येणार नाही, असा जर प्रश्न कोणी विचारला तर ते परिस्थितीतवर अवलंबून राहील, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. करोनाच्या जागतिक स्थितीनुसार किती लवकर ही सेवा सुरू करणे शक्य आहे हे अवलंबून आहे, असे ते म्हणाले.