पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महायुतीमध्ये रिपाइंच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या संतप्त भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आलेल्या आहे.राज्यात मंत्रिपद देण्यात आलेले नाही.
लोकसभेच्या दोन जागा मागितल्या असताना, त्यावर चर्चेसाठीही बोलावलेले नाही. त्यामुळे महायुतीत आम्ही नाराज असून येत्या दोन-तीन दिवसांत पुढील भूमिका जाहीर करू, असा इशारा रिपाइंचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.
पुण्यात गुरुवारी रिपाइं (आठवले गट) पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर आठवले बोलत होते. गेल्या १२ वर्षांपासून आम्ही भाजप सोबत आहोत. तर महायुतीत नव्याने सहभागी झालेल्या एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पक्षाला महत्वाचे स्थान दिले जाते. आम्ही जुने मित्र पक्ष असतानाही आम्हाला योग्य ते स्थान दिले जात नाही. रिपाइंच्या कार्यकर्त्याना कुठेही विश्वासात घेतले जात नाही, असे म्हणत आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीत शिर्डी, सोलापूर मतदारसंघ आम्हाला मिळावेत, यासाठी फेब्रुवारीत महायुतीकडे प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यावर चर्चाही करण्यात आलेली नाही. सोलापूरच्या जागेसाठी आमचा उमेदवार तयार असतानाही भाजपने उमेदवार जाहीर केला, असे आठवले यांनी सांगितले. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर महायुतीत राहायचे, की नाही याबाबत वेगळा विचार करू असे आठवले म्हणाले.