मुंबई – देशासह राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता निर्माण झाली आहे. तरुणांना फुले-शाहू-आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याची दिशा आपल्याला द्यावी लागेल. यासाठी वैचारिक बैठका घ्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
जयंत पाटील म्हणाले, सध्या देशात गोबेल्स निती अवलंबिली जात आहे. खोट्याला खरं ठरवण्याचा खटाटोप सुरू आहे. या गोबेल्स नितीला मारक अशी संघटना आपल्याला तयार करायची आहे. आज पेट्रोल-डिझेल, सिलेंडरचे भाव वाढले आहेत या समस्यांकडे पाहणे गरजेचे आहे. तसेच पक्षाची एक योग्य रचना आपल्याला करायची आहे, ही रचना येत्या काळात तुम्ही कराल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपली संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, संघटनेला एक भूमिका देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरलो आणि वाईत पोहोचलो आहे. आपल्या पक्षाची बैठक व्यापक केली पाहिजे. संघटना व्यापक झाली पाहिजे. सर्व समाजातील, सर्व गावातील लोकांना एकत्र करून आपल्या संघटनेत घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.